विरोधी उमेदवाराला मुख्यमंत्र्यांकडून किती कोटींचे पॅकेज मिळाले ?
मतदार संघात जोरदार चर्चा
कोट्यावधीच्यापेड न्यूज आणि जाहिराती दिल्याचीही चर्चा
प्रतिनिधी —
शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपये पाठविले असल्याची चर्चा असतानाच आता त्यांनी मराठी, गुजराती वृत्तपत्रांना कोट्यावधी रुपयांच्या पेड न्यूज दिल्या असल्याच्या बातम्या झळकू लागल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीतील पैशाचे राजकारण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. असे असताना विरोधी उमेदवारांना मुख्यमंत्र्यांकडून किती कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले याची जोरदार चर्चा मतदार संघात रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांकडून कोट्यावधी रुपयाचे पॅकेज निवडणूक लढविण्यासाठी पाठविण्यात आल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू होती. याबाबत राजकीय पुढाऱ्यांकडून उलट सुलट आरोप देखील झाले. काही ठिकाणी असे कोट्यावधी रुपये पकडले गेल्याने या चर्चेला पुष्टी देखील मिळाल्याचे बोलले जात होते. या सर्व पार्श्वभूमीवर संगमनेरच्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवाराला देखील किती कोटी रुपयांचे पॅकेज आले ? याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात रंगली असून हे पॅकेज लपवून ठेवले की त्या पैशाच्या जोरावर निवडणुकीत वारेमाप खर्च केला जातोय असा सूर देखील ऐकण्यास मिळत आहे. विशेष म्हणजे पॅकेजचा आकडा २५ कोटी रुपयांवर नेऊन ठेवला असल्याचा दावा रंगला आहे.

राजकारणात एकमेकांची जिरवण्यासाठी कोण काय हत्यार वापरेल याचा नेम नाही. काही नेते यात माहीर असून आपल्या विरोधकांना राजकीय आव्हान देण्यासाठी असे ‘राजकीय प्यादे’ वेळोवेळी शोधत असतात. त्याची अनेक उदाहरणे नगर जिल्ह्यात पाहण्यास मिळाली आहेत. त्यामुळे असे व्यक्तीद्वेषाचे राजकारण टिकत नसले आणि यशस्वी होत नसले तरी वाममार्गाने कमावलेला पैसा निवडणुकीच्या काळात उधळला जातो हे देखील मतदार आणि जनता पहात असते.

असाच प्रकार प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस ऐकण्यास, पाहण्यास मिळतो. कोट्यावधी रुपये पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या यंत्रणे करून पकडले गेल्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात देखील असे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे संगमनेर विधानसभा हा आर्थिक संवेदनशील मतदार संघ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे निवडणुकी आधीच या मतदारसंघात पैशांवर निवडणूक आयोगासह पोलिसांचे लक्ष आहे. म्हणून या मतदारसंघात कुठून, किती, कसा पैसा आला याची चर्चा तर होणारच.

शिवाय आजी माजी मंत्र्यांमध्ये देखील राजकीय फड रंगला असून एकमेकांच्या विरोधात जोरदारपणे राजकीय शक्ती प्रदर्शन सुरू आहे. या सर्व शक्ती प्रदर्शनात पैशाचा वापर मात्र मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाने खर्च संदर्भात विविध नियम अटी घालून दिल्या असल्या तरी आणि त्यासंबंधीत लक्ष असले तरी प्रत्यक्ष पाहता तालुक्यात जो काही उत – मात चालू आहे, त्यावरून मतदारसंघांमध्ये बाहेरून पैसा आला हे निश्चित दिसून येत आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत झालेल्या आरोपांची चर्चा सर्वत्र सुरू असून या आरोपांमधूनच संगमनेरचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार असलेले महायुतीचे उमेदवार यांना देखील मोठे घबाड या माध्यमातून मिळाले असावे अशी शंका नागरिक उपस्थित करतात. त्यामुळे हे पॅकेज किती कोटींचे आहे ? तेच बाहेर आले आहे काय ? किंवा त्यातून किती माल लपवून ठेवला आहे ? कोण कोणत्या पदाधिकाऱ्यांचे चांगभले करण्यात आले आहे ? अशा विविध खमंग विषयांवर मतदार संघात चर्चा रंगली आहे. मात्र यातील खरे काय आणि खोटे काय याबाबतही साशंकता व्यक्त होत असल्याने या निवडणुकीतल्या हवेतल्या चर्चा असल्याचे देखील बोलले जाते.

पॅकेज मधून भविष्याची तरतूद…
संगमनेर विधानसभेसह नगर जिल्ह्यातल्या निवडणुका म्हणजे काही मंडळींना भविष्याची तरतूद करण्यासाठीचा एक सोपा मार्ग असल्याचे देखील वेळोवेळी बोलले गेले आहे. कुठलेही राजकीय अस्तित्व नसताना आणि राजकीय व सामाजिक कार्य नसताना आपली उमेदवारी जाहीर करून वेळेला भविष्याच्या पोटापाण्याची तरतूद करून नंतर पाच वर्षे गप्प बसून घेण्याचा उद्योग यापूर्वी काही मंडळींनी केला आहे. निवडणुकानंतर त्यांचे राहणीमान चांगलेच वधारले होते. त्यामुळे पॅकेजच्या स्वरूपात मिळालेल्या पैशांचा वापर निवडणुकांमधून न होता स्वतःच्या भविष्याची आर्थिक तरतूद करून ठेवण्यासाठी देखील केला जात असल्याचे मतदारसंघाने वेळोवेळी पाहिले आहे. कारण निवडणुका लढवल्यानंतर कुठलाही विरोधी उमेदवार आर्थिकरित्या डबघाईला गेलेला दिसला नाही. उलट त्यांची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली असल्याचे दिसून येते. निवडणूक झाल्यानंतर काही तथाकथित विरोधी उमेदवार जणू काही आपण या मतदारसंघातले नाहीच असे मौनी बाबा बनून पुढील कार्यकाळात जनतेला वाऱ्यावर सोडून वावरताना दिसले आहेत.

