छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये काँग्रेसचे आंदोलन

बेजबाबदार शासनाला जनतेने शिक्षा द्यावी — माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

मालवणची घटना सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी- डॉ. जयश्री थोरात

प्रतिनिधी —

संपूर्ण देशवासीयांचे  आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मोठा संताप निर्माण झाला असून या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये युवक काँग्रेस व शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाराजांना अभिवादन करून मालवण किनाऱ्यावरील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला महाराजांचा पुतळा पडल्याने या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी युवक काँग्रेस शिवसेना व शिवप्रेमी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, शिवसेनेचे अमर कतारी, राष्ट्रवादीचे बी.जी. देशमुख, सुरेश झावरे, निखिल पापडेजा, अर्चना बालोडे, नवनाथ अरगडे, सुभाष सांगळे, पद्मा थोरात, अमृता राऊत आदींसह युवक काँग्रेसचे सर्व कार्याध्यक्ष सरचिटणीस पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सरकारचा निषेध करत बसस्थानक ते नवीननगररोड निषेध मोर्चा काढण्यात आला. यानंतर प्रांताधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

डॉ. तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचा पुतळा कोसळणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आणि संताप जनक आहे. असे असताना शासन मात्र ही जबाबदारी एकमेकांवर ढकलाढकली करत आहेत. अत्यंत बेपर्वाही असलेले हे सरकार बेताल वक्तव्य करत आहेत. जनतेने या सरकारला कडक शिक्षा दिली पाहिजे. शिक्षणमंत्री सुद्धा या संवेदनशील विषयावर बेजाबाबदार वक्तव्य करतात ही अत्यंत चिंताजनक असून या महाराष्ट्र सरकारचा आपण निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी शितल उगलमुगले, प्रदीप हासे, आनंद वर्पे, शुभम राहणे, अक्षय ढोकरे, वैष्णव मुर्तडक, शुभम पेंडभजे, विशाल ढोले, मनीष राक्षे, शुभम शिंदे, रोशन गोपने, ऋतिक राऊत, सचिन खेमणर, अनिल कांदळकर, पप्पू कानकाटे, सागर कानकाटे, तात्या कुटे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या.

महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना महाराष्ट्रासाठी वेदनादायी – डॉ. थोरात

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा  उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. खरे तर महाराजांनी उभारलेले गड किल्ले हे चारशे वर्षापासून तसेच आहेत आणि  या भ्रष्टाचारी सरकारने उभारलेल्या पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे. यामधील ठेकेदार आणि भ्रष्टाचारांना कडक शिक्षा झाली पाहिजे याचबरोबर या सरकारने या घटनेची जबाबदारी घेतली पाहिजे दुर्दैवाने राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा नौदलावर या घटनेची जबाबदारी ढकलतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. नौदल हे सागरी किनाऱ्याचे रक्षण करते मात्र त्यांच्यावर आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे  चुकीचे आहे .सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. ठेकेदार आणि भ्रष्टाचारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!