संगमनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा — प्रा. शशिकांत माघाडे
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे कार्यकारी सदस्य प्राध्यापक शशिकांत माघाडे यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नुकतेच महाराष्ट्र शासनाचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेरात बसवण्याची घोषणा केली याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.

संगमनेर तालुक्याला ऐतिहासिक परंपरा असून छत्रपतींच्या पदस्पर्शाने हा तालुका पावन झालेला आहे. संगमनेर तालुका अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील संगमनेरला भेट दिली आहे हे सर्वांना ज्ञात आहे.

गेली अनेक वर्षे संगमनेरात प्रत्येक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमाची सुरुवात बहुजन पालक, जाणता राजा छ्त्रपती शिवाजी महाराज आणि बहुजन उद्धारक प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन करून केली जाते. सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारे दोन्ही पुतळे एकाच ठिकाणी आहेत . गेली अनेक वर्षे संगमनेरात या दोन्ही महामानवांचे पूर्णाकृती पुतळे बसविले जावेत अशी मागणी केली जात होती.

शासनाने या मागण्यांची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल शासनाचे त्रिवार अभिनंदन!

मात्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्या बाबद उदासीन धोरण ठेवले असून बहुजन समाजाच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. वस्तुतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक जातीसाजे किंवा धर्माचे महापुरुष नसून सर्व बहुजनांचे आणि भारतीय नागरिकाचे प्रेरणास्थान आहे. संगमनेरकर नागरिक सर्वधर्मसमभाव या भारतीय संविधानाने दिलेल्या विचारांचा आदर करणारी आहे. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक भेटीची आठवण ठेऊन येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य आणि उचित स्मारक होणे गरजेचे आहे.

बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याशेजारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती झाल्यास ते न्यायला धरून होईल. सामाजिक सलोखा आणि सौहार्द राखण्यासाजे दृष्टीने शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्या सोबत बसवावा.

निवेदनावर बी .आर. कदम (अध्यक्ष), के.एस.गायकवाड (उपाध्यक्ष), अण्णासाहेब आडांगळे (सेक्रेटरी), विलास दारोळे (खजिनदार), कुसुमताई माघाडे (सहखजिनदार), ए.पी. बनसोडे (सह सेक्रेटरी), हिरालाल पगडाल (सल्लागार), प्रा.जी.बी.कदम (सल्लागार), प्राचार्य अरूण गायकवाड (सल्लागार), प्रा.श्रीरंग तलवारे (सल्लागार), रामनाथ जगताप (कार्यकारी सदस्य) ॲड. अमित सोनवणे, विनय घोसाळे, दिलीप भोरूंडे, डॉ. रवींद्र घोसाळे, ज्ञानेश्वर राक्षे, संजय अहिरे, गौतम गायकवाड, असिफ शेख, विनोद गायकवाड, प्रवीण रुपवते, संदीप गोसावी, राम चन्ना , ॲड. बाळासाहेब झालटे, डॉ. संजय गायकवाड, किशोर वाघमारे, अश्विनीकुमार बोर्डे, किशोर घोलप,हेमंत मेढे यांची नावे आहेत.

