ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेला विजय म्‍हणजे महायुती सरकारच्‍या कामावर मतदारांनी केलेले शिक्‍कामोर्तब —  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

प्रतिनिधी —

ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेला विजय म्‍हणजे महायुती सरकारच्‍या कामावर मतदारांनी केलेले शिक्‍कामोर्तब असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरु असलेल्‍या विविध योजनांच्‍या अंमलबजावणीचे मिळालेले हे प्रभावी यश आहे. सरकार आणि संघटना यांच्‍यातील समन्‍वयाने सुरु असलेल्‍या विकासात्‍मक कामाला मतदारांनी साथ दिली असल्‍याची प्रतिक्रीया महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली राहाता तालुक्‍यातील ९ ग्रामपंचायतींमध्‍ये जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले आहेत. संगमनेर तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतींमध्‍ये आणि श्रीरामपूर तालुक्‍यातील ७ ग्रामपंचायतींमध्‍ये विजयी झालेल्‍या उमेदवारांचे अभिनंदन करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, आमचे नेते आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागात केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांचा लाभ शासन आपल्‍या दारी या उपक्रमातून पोहोचविण्‍याचे काम निरंतरपणे सुरु आहे. समाजातील सर्व घटकांशी या उपक्रमातून होत असलेला सुसंवाद याचे यश या निवडणूकीत दिसून आले आहे.

राज्‍यात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली महायुतीचे सरकार आल्‍यानंतर ग्रामीण भागाच्‍या विकासाला मोठी गती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या  महत्‍वकांक्षी जलजीवन मिशन योजनेचे काम गावागावात सुरु झाले आहे. केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या योजनांचा लाभही थेट लाभार्थ्‍यांना मिळत असल्‍याचा परिणाम या निवडणूकीत पाहायला मिळाला. तसेच राज्‍य सरकारच्‍या  माध्‍यमातूनही ग्रामीण भागाच्‍या विकासाला निधी उपलब्‍ध होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकी मिळालेले यश म्‍हणजे सरकारच्‍या कामावर एक प्रकारे मतदारांनी विश्‍वास व्‍यक्‍त केला असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातून विविध योजनांचा पाठपुरावा कार्यकर्त्‍यांच्‍या होत असतो. सरकार आणि संघटना यांच्‍यातील समन्‍वयाचा योग्‍य परिणाम या निवडणूकीच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट झाला असून, राहाता तालुक्‍यातील विकासाला कधीही निधी कमी पडू दिला नाही. राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून शिर्डी मतदार संघाच्‍या विकासाला उपलब्‍ध होत असलेल्‍या निधीबद्दल त्‍यांनी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांचे आभार मानून विकासाची प्रक्रीया आणि शासन योजनांची अंमलबजावणी यशस्‍वीपणे होत असल्‍यामुळेच सर्व योजनांचे लाभार्थी हे शिर्डी मतदार संघात सर्वाधिक असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!