स्मशानभूमीच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पाडले म्हणून अमोल खताळ यांच्या नावाने काँग्रेस पुढाऱ्यांचा थयथयाट !
आमदार, त्यांचा भाऊ व एक ठेकेदार गावातील पुढार्यांना हाताशी धरून खताळ यांची बदनामी करत आहेत — वाल्मीक शिंदे
प्रतिनिधी —
चिकणी गावातील स्मशानभूमीच्या कामासाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी निधी दिला असून या सुशोभीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने अमोल खताळ यांनी यासंदर्भात पंचायत समिती कडे तक्रार केली व बोगस कामाचे पितळ उघडे पाडले. त्यामुळे राग आल्याने काँग्रेसचे पुढारी आणि ठेकेदार हे सगळे मिळून खताळ यांच्या नावाने ‘थयथयाट’ करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुका सरचिटणीस वाल्मीक शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, चिकणी गावातील विकास कामांसाठी नामदार विखे पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून मी निधी मागितला होता. त्यानुसार स्मशाभूमी सुशोभीकरणसाठी निधी येऊन त्यांचे काम गावातील काँग्रेस कार्यकर्ता व काही ग्रामपंचायत सदस्य भागीदारी मध्ये करत होते. ते काम निकृष्ट सुरू असल्यामुळे मी त्याचा ठेकेदार दर्शन वर्पे यास जाब विचारला असता त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.

त्यामुळे व्यथित झालेल्याने मी भारतीय जनता पार्टीचे अमोल खताळ पाटील यांच्याकडे तक्रार करून गावातील काही काँग्रेसचे गुंड प्रवृत्तीचे लोक मला धमकी देत आहे असे सांगितले. त्यामुळे अमोल खताळ यांनी याबाबत पंचायत समिती उपअभियंता नाना अहिरे यांना फोन करून व मेसेज द्वारे तक्रार दिली. परंतु त्यांनी काँगेस नेत्यांच्या दबावामुळे दुर्लक्ष करून कामाची पाहणी केली नाही.

त्यामुळे अमोल खताळ यांना मी व आमच्या गावातील बीजेपी कार्यकर्ते यांनी केलेल्या विनंती वरून ते दि.०९ ऑक्टोंबर २०२३ रोजी कार्यकर्त्यांसह कामाची पाहणी करण्यासाठी आले असता स्थानिक काँग्रेसच्या लोकांनी उपसरपंच यांच्या सहीने सदर काम सुरू असून काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे असे सांगितले. तपासणी मध्ये ते सिद्ध झाले. त्यावेळेस ग्रामसेवक यांनी सुद्धा मान्य केले सदर काम अतिशय निकृष्ट झालेले असून आम्ही बिल काढणार नाही असे त्यांनी सांगितले.

कामावरूनच अमोल खताळ यांनी बिडीओ नागणे, उपअभियंता अहिरे यांना फोन करून याबाबत कल्पना दिली असता त्यांनी सुद्धा कामाचे बिल काढणार नाही, जे निकृष्ट काम झालेले असेल ते पुन्हा ठेकेदाराकडून करून घेतले जाईल असे सांगितले. अमोल खताळ व गावकरी यांनी केलेल्या पाहणीचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामधे कुठेही तोडफोड झालेली नसून त्यांनतर आता जर काही नुकसान झाले असेल तर त्याला स्थानिक काँग्रेस नेते व ठेकेदार जबाबदार असू शकतो.

चिकणी गावात सत्तेचा गैरवापर नेमके कोण करत आहे हे लोकांना माहीत आहे. निषेध ठराव घेताना कामाची गुणवत्ता नियंत्रण पथक करून तपासणीचा ठराव झाला असता तर भ्रष्ट्राचाराला पाठीशी घालणारे उघड पडले असते. संगमनेर मध्ये विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचाराला अमोल खताळ विरोध करत आहेत. त्यांचे काम चांगले सुरू असल्यामुळे विनाकारण खताळ यांना बदनाम करण्याचे कारस्थान आमच्या गावातील लोकांना हाताशी धरून आमदार, त्यांचा भाऊ व एक ठेकेदार करत आहे. असा आरोप देखील शिंदे यांनी केला आहे.

यशोधन संपर्क कार्यालयातून अमोल खताळ यांच्या विरोधात प्रेस नोट दिली जाते याचा अर्थ खताळ यांचे काम जोरात सुरू झाले आहे असे वाल्मीक शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
स्मशानभूमीच्या निकृष्ट कामाची पाहणी करते वेळेस चिकणी गावातील मुचकुंद वर्पे, रवींद्र भिकाजी वर्पे, राजेंद्र चांगदेव वर्पे, शिवाजी किसन वर्पे, जगन्नाथ घुले, शशिकांत वाघमारे, वैजनाथ वर्पे, कांताराम वर्पे, ग्रामपंचायत सदस्य संदीप रामचंद्र वर्पे, गोरक्ष वर्पे, सुरेश माळी, विजय वर्पे, अशोक वर्पे यादी ग्रामस्थ उपस्थित होते. असेही पत्रकात म्हटले आहे.

