कंत्राटी शाळा परिपत्रकाची केली होळी !
छात्रभारतीचे संगमनेर बस स्थानकावर आंदोलन
प्रतिनिधी —
सरकारी शाळा बंदीचा निर्णय मागे घ्यावा, शिक्षणाचे कंत्राटी करण थांबवावे यासाठी संगमनेर बस स्थानकावर छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून शाळांचे कंत्राटीकरण संदर्भाने जे परिपत्रक निघाले आहे त्याची होळी करण्यात आली असल्याची माहिती छात्र भारतीच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यातील सरकारी शाळा कंपन्यांना चालवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय गोर गरीब, आदिवासी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण संपवणारा निर्णय आहे. यामध्ये जवळ पास १४ हजार पेक्षा जास्त शाळा बंद केल्या जाणार आहेत. ६५ हजार पेक्षा जास्त शाळा कंपन्यांना चालवायला देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय धोकादायक आहे. गरिबांना शिक्षण नाकारणारा आहे.

शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यापासून सरकारने हात काढून घेऊ नये. शिक्षण हक्क कायदा असे सांगतो कि, एक किलोमीटरच्या आत शाळा असायला हवी. हा कायदा सरकार सरळ धुडकावून लावत आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करावा असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या वेळी अनिकेत घुले, टीडीएफ संघटनेचे हिरालाल पगडाल, राहुल जऱ्हाड, गणेश जोंधळे, ज्ञानेश्वरी सातपुते, वैष्णवी भोईर, सागर मोरे, सुहानी गुंजाळ, श्रावणी गायकवाड, वैष्णवी भोईर, विशाल मिसाळ, मकरंद जगताप, सुयश गाडे, प्रथमेश गाडे, नेहा काळे, रोशन राऊत, यश मुर्तडक, कावेरी आहेर, भरत सोनवणे आशिष घुले, सोहम घुले, अनिकेत खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

