संगमनेर मर्चंट्सला ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील’ बँक पुरस्कार!
प्रतिनिधी —
अहमदनगर जिल्ह्यातील व्यापार्यांची पहिली बँक म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट्स बँकेला २०२१-२२ या वर्षाचा ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बँकेच्या भक्कम आर्थिक प्रगतीचा, पारदर्शक कारभाराचा आणि अत्याधुनिक वेगवान सेवेचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया बँकेचे प्रमुख मार्गदर्शक, उद्योगपती राजेश मालपाणी यांनी दिली.

नाशिक येथे आयोजित सोळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सहकार आयुक्त अनिल कवडे व विश्वास ठाकुर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेच्या वतीने तत्कालीन चेअरमन दिलीप पारख, विद्यमान चेअरमन संतोष करवा, व्हा.चेअरमन प्रकाश कलंत्री, राजेंद्र वाकचौरे, प्रकाश राठी, मधुसूदन नावंदर, महेश डंग, रवींद्र पवार, शाम भडांगे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, सहाय्यक मुख्य व्यवस्थापक विठ्ठल कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई येथील महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँक्स असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार सहकारी बँकिंगच्या क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जातो. मागील दहा वर्षात बँकेला मिळालेला हा बारावा पुरस्कार आहे. २५० ते ५०० कोटी रुपये या दरम्यान असलेल्या शहरी भागातील गटात बँकेने हा सन्मान प्राप्त केला आहे.

या पुरस्काराबाबत अधिक बोलतांना मालपाणी यांनी बँकेचे संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी व त्यांना भक्कम साथ देणार्या तत्कालीन सहकार्यांनी आखून दिलेल्या धोरणांवरच मार्गक्रमण केल्याने हा सन्मान झाल्याचे सांगितले. बदलत्या काळासोबत बँकेने माहिती व तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन सर्व प्रकारच्या आधुनिक व वेगवान सेवा देवून ग्राहकाभिमुख कारभारावर अधिक भर दिला. संचालक मंडळाच्या बैठकीत प्रत्येक निर्णयाच्या सर्वबाजू पडताहून निर्णय घेण्याची पद्धत संस्थेची आर्थिक स्थिती अधिकाधिक भक्कम करणारी असल्याची सांगत सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, हिंतचिंतक आणि तत्पर संवा देणार्या कर्मचारी वृंद यामुळे यापुढील काळातही बँकीची अशीच भरभराट होत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संचालक मंडळाची खंबीर साथ आणि बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने समर्पित भावनेतून केलेल्या कामाच्या जोरावरच हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे चेअरमन संतोष करवा म्हणाले. संस्थापकांना अपेक्षीत असलेल्या पद्धतीनेच कामकाज केल्याने बँकिंग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद होत असल्याचे तत्कालीन चेअरमन दिलीप पारख यांनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट सांघिक कामगिरीचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्हा.चेअरमन प्रकाश कलंत्री यांनी दिली.

