आता संगमनेर तालुक्यात कोंबडी चोर !
प्रतिनिधी —
राज्याच्या राजकारणात ‘कोंबडी चोर’ प्रकरणाची चर्चा अधून मधून होत असते. त्यावर विनोदही होत असतात. आता संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कोंबडी चोराने चक्क २५ कोंबड्या चोरून नेल्याची घटना घडली आहे.

ईश्वर लक्ष्मण कान्होरे (रा. आंबी खालसा, ता. संगमनेर) यांच्या शेतातील गट नंबर ३६३ मध्ये पोल्ट्री फार्म आहे. या पोल्ट्री फार्मचा लोखंडी जाळीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून पोल्ट्री फार्म मधील २५ कोंबड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

कान्होरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक लांघे हे पुढील तपास करत आहेत.

सदर कोंबड्यांची किंमत ४ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे गुन्हे घडण्याचे प्रमाण सातत्याने दिसून येते. शेतकऱ्याच्या विद्युत मोटारी चोरण्याची घटना नेहमीचीच आहे. शेळ्या – मेंढ्या देखील चोरल्या जातात. आता कोंबड्या चोरण्याचे देखील प्रकार सुरू झाले आहेत.

