मला मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा आदिवासी समाजाचा गौरव — मधुकर पिचड
प्रतिनिधी —
मला मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असून संपूर्ण आदिवासी समाजाचा हा गौरव असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवन साधना पुरस्कार जाहीर केला आहे. याबद्दल राजूर (ता.अकोले) येथे निवासस्थानी बोलतांना माजी मंत्री पिचड यांनी आनंद व्यक्त करत कुणावरही टीका टिपण्णी करणे टाळले.

यानिमित्ताने तालुक्यासह नगर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजूर येथील निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

पिचड म्हणाले की, या पुरस्काराचे श्रेय अकोले तालुक्यातील जनता व महाराष्ट्रातील आदिवासी जनतेला देतो. सत्य कितीही झाकून ठेवले तर वेळ यावी लागते. सत्य काम जनते समोर आणण्याचे काम विद्यापीठाने केले आहे. वयाची ८२ वर्ष पूर्ण करून उत्तरार्धात या पुरस्कारामुळे माझा व अकोले तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण आदिवासी समाजाचा गौरव होत आहे. याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ऋण व्यक्त करतो असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी बजेट संदर्भात आपनाकडून काही सूचना मागितल्या. त्यानुसार काही सूचना केल्या आहेत. प्रत्येक कामात वर्षानुवर्षे बदलत्या काळात मागण्या वाढतात. असे ते म्हणाले. अकोले तालुक्यात गेल्या ४० वर्षात जे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय काम केले. त्याचे सर्व श्रेय जनतेला आहे.

माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण मी समजतो. वय वाढले आहे. स्वतःला भाग्यवान समजतो. त्यामुळे इतरांचे उणे दुणे काढण्यात मला स्वारस्य वाटत नाही. कुणावर टीका करायची नाही, वाईट पणा घ्यायचा नाही. अनेक कामे अपूर्ण राहिलेली जनतेला वाटतात. गरजेप्रमाणे कामे होत असतात. माझ्या परीने जे करायची ती विकासकामे केली. अकोले तालुक्यातील जनतेने सात वेळा विधानसभेत पाठविले त्यामुळे कामे करता आली. याबद्दल पिचड यांनी जनतेचे आभार मानले.

