संगमनेर तालुक्यात दिवसाढवळ्या घरपोडी आणि चोरी !
गुन्ह्यांचा तपास लागत नाही, पोलिसांवर नाराजी !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि ग्रामीण भागात घरफोडी आणि चोरीचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे हे प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत. ग्रामीण भागात विहिरीवरील, तलावा जवळील मोटारी, मोटारसायकली यांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढतेच असून घरफोडी आणि सोन्याच्या दाग दागिन्यांची दिवसाढवळ्या चोरी होऊ लागली आहे.

तालुक्यातील कासारे या गावात एका बंद घराचे कुलूप तोडून भर दिवसा चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. परसराम वामन कार्ले (रा. कासारे, ता. संगमनेर) यांनी यासंदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

गुरुवारी दुपारी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कार्ले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि अडीच तोळे वजनाचे नेकलेस चोरून नेले आहे.

त्याचप्रमाणे आश्वी या ठिकाणी कुलथे ज्वेलर्स यांच्या दुकानाच्या ओट्यावरून दीड तोळे वजनाची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली आहे. यात मात्र एक महिला आणि एक अल्पवयीन मुलीचा समावेश होता.

शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आश्वी गावातील कुलथे ज्वेलर्स यांच्या दुकानाच्या ओट्यावर सोन्याचे दागिने गाठणीचे दुकान आहे. गाठणीसाठी आलेली सोन्याची पोत एका अनोळखी ४५ वर्षीय महिलेने आणि तिच्याबरोबर आलेल्या अल्पवयीन मुलीने चोरून नेली असल्याची फिर्याद सोमनाथ सुरेश भालकर (रा. पानोडी, ता. संगमनेर) यांनी दिली आहे. आश्वी पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार डी.डी. बेर्डे हे करत आहेत.

गुन्ह्यांचा तपास लागत नाही पोलिसांवर नाराजी !
संगमनेर शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या घरफोड्या, चोऱ्या, पाकीट मारी याचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन-चार महिन्यात संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, आश्वी आणि घारगाव या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर घरफोडी, चोऱ्या झाल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास लावण्यात चारही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. एकाही गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

