राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे शांतीदूत – आमदार डॉ.सुधीर तांबे
काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी
प्रतिनिधी —
सत्य,अहिंसा व त्यागाची शिकवण देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने भारतच नव्हे तर जग चालत असून ते आंतरराष्ट्रीय शांतीदूत ठरले ठरले असल्याचे गौरवौद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केले आहेत.

यशोधन संपर्क कार्यालय येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, डॉ. जयश्री थोरात, प्रमिला अभंग, बाळासाहेब पवार, सुनील कडलग, भारत वर्पे, बाळासाहेब वाळके, तात्याराम कुटे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, सतीश शिंदे, शशिकांत पवार, रमेश नेहे, ऋतिक राऊत, जावेद शेख आदी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.तांबे म्हणाले की, जगाच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मोठे स्थान आहे. गांधींजींसह अनेक स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रपुरुष यांनी केलेल्या त्यागातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाच्या विकासात लोकशाही महत्त्वाची ठरली असून शांतता व एकोपा नांदण्यासाठी महात्मा गांधींनी दिलेले सत्य, अहिंसेचे तत्व हे भारताला नव्हे तर जगाला दिशादर्शक ठरले आहे. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री हे थोर देशभक्त होते. स्वातंत्र्य लढ्यात महत्वपुर्ण योगदान देणाऱ्या शास्त्रीजींनी १९६५ च्या भारत पाक युध्दात भारताला विजय मिळवून दिला. या दोन्हीही महानविभुतींचे जीवनकार्य भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी ठरले आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधींमुळे भारताची ओळख ठरली आहे. महात्मा गांधी हे संपुर्ण जगाचे शांतीदूत असून महात्मा गांधींच्या विचारांचा सर्व तरुण पिढीने अनुकरण करावे असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, महात्मा गांधी यांचे जीवन कार्य हे पूर्ण संघर्षातून उभे राहिलेले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोरगरीब सर्वसामान्यांना सामावून घेतांना महात्मा गांधींनी संपूर्ण देश जागा केला. या आंदोलनातून ब्रिटिशांना धडकी भरवली. ब्रिटिशांच्या अत्याचाराला त्यांनी अहिंसेतून उत्तर दिले. असे सत्य व अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान आजही प्रत्येकासाठी अनुकरणीय आहेत. याचबरोबर नव्या पिढीने गांधीजींच्या जीवन चरित्राचा अभ्यास करावा असेही त्या म्हणाल्या.

