निळवंडे पाण्याबाबत गैरसमज निर्माण करणार्‍यांकडे लक्ष देऊ नका — महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

निळवंडे साठी कोणतेही योगदान नाही… संगमनेरवर टीका करणाऱ्यांना ज्ञान येते कुठून ?  नाव न घेता विखेंना टोला

थोरात कारखान्याचे १५ लाख ५१ हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी गाळप

प्रतिनिधी —

 

संगमनेर तालुक्यातील जनतेच्या प्रेमामुळे व नेतृत्वाच्या विश्वासामुळे आज राज्यात मोठा सन्मान मिळत आहे. या पदाचा तालुक्याच्या विकासासाठी आणि निळवंडे कालव्याच्या कामासाठी आपण सातत्याने उपयोग केला आहे. कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू असून ऑक्टोबर २२ मध्ये दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र या कामात कोणतेही योगदान न देणारे आता पाण्याबाबत काही अफवा पसरवत आहेत. आपण संगमनेर तालुक्याच्या न्याय हक्काचे पाणी घेणार असून पाण्याची काटकसर व ठिबक सिंचनाचा वापर करुन हा तालुका समृद्धीत एक नंबर आहे आणि तो पुढेही राहील हाच आपला प्रयत्न आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये. गैरसमज निर्माण करणार्‍यांकडे लक्ष देऊ नका. असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरण आणि कालवे संदर्भात वक्तव्य केले होते. त्यानंतर संगमनेरच्या गळीत हंगाम सांगता समारंभात महसूल मंत्री थोरात यांनी हा टोला लगावला आहे.

कारखान्याने कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रात बाहेरील सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप केले आहे. निर्विघ्नपणे १५ लाख ५१ हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप झाले असून संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आपण सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. निळवंडेच्या कालवे यांसह विकास कामे वेगाने सुरू आहे.

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१ – २२ च्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. प्रेरणा शिंदे, रामहरी कातोरे, मधुकर नवले, हौशीराम सोनवणे, मिरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, अजय फटांगरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

 

यावेळी ३७ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक आंबा वृक्ष, शाल, फेटा व अमृतमंथन, अमृतगाथा हे ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

 

नामदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील जनतेच्या प्रेमामुळे व नेतृत्वाच्या विश्वासामुळे आज राज्यात मोठा सन्मान मिळत आहे. या पदाचा तालुक्याच्या विकासासाठी आणि निळवंडे कालव्याच्या कामासाठी आपण सातत्याने उपयोग केला आहे. कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू असून ऑक्टोबर २२ मध्ये दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र या कामात कोणतेही योगदान देणारे आता पाण्याबाबत काही अफवा पसरवत आहे. आपण संगमनेर तालुक्याच्या न्याय हक्काचे पाणी घेणार असून या पाण्याची काटकसर व ठिबक सिंचनाचा वापर करुन हा तालुका समृद्धीत एक नंबर आहे आणि तो पुढेही राहील हाच आपला प्रयत्न आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये.

 

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पिण्याच्या पाणी योजनेसाठी ६१६ कोटी रुपये तर तलाव दुरुस्तीसाठी ३२ कोटी रुपयांचा निधी मिळविला. शहराच्या चारही रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ज्यांना चांगले काम पहावत नाही जे बाहेरच्या भूलथापांना बळी पडतात ते विनाकारण जनतेमध्ये गैरसमज पसरवतात. थोरात कारखान्याने अत्यंत चांगले काम केले असून कार्यक्षेत्रा बरोबर इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्यास मोठी मदत केली आहे.

 

संगमनेर च्या सर्व सहकारी संस्था अत्यंत चांगल्या सुरू असून राज्यात एक नंबर आहे. मात्र हे काहींना पाहवत नाही आणि त्यामुळे ते टीका करत असतात. शहराला चोवीस तास पाणी मिळत असून याबाबतही टीका करणाऱ्यांना ज्ञान येते कुठून हा मोठा प्रश्न आहे. यापुढील काळात कारखाना कार्यक्षेत्रातील व बाहेरही ऊस उत्पादकांनी नोंद करणे अत्यंत गरजेचे आहे. या वर्षी सुमारे एक हजार हेक्‍टर उसाची नोंद नसल्याने नियोजनामध्ये काही अडचण झाली. म्हणून शेतकऱ्यांनी नोंदणी केली पाहिजे. त्याचबरोबर हेक्टरी उत्पादन वाढवण्यावर ही भर द्यावा असेही ते म्हणाले.

 

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की या वर्षी थोरात कारखान्याने ११.८४ चा उतारा राखून जिल्ह्यात एक नंबर राखला आहे. १५ लाख ५१ हजाराचे विक्रमी गाळप करताना ६२ कोटी ६३ लाखची वीज निर्मिती केली आहे. या सर्व मध्ये कामगार सभासद यांचा मोठा वाटा राहिला असल्याचे ते म्हणाले.

 

यावेळी दादापाटील वाकचौरे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, किशोर टोकसे, गजेंद्र अभंग, बाळासाहेब डांगरे, कारखान्याचे संचालक गणपत सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ ,रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, अभिजित ढोले, संपत गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिक यादव, भास्कर आरोटे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, मीरा वर्पे, मंदा वाघ, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले

 

अमृतशक्ति सेंद्रिय खत व डिस्टलरी प्लांट चे भूमिपूजन

कारखान्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खत प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ व नवीन डिस्टलरी प्लांटचे भूमिपूजन आणि कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन यावेळी नामदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. तर ३७ कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार नामदार थोरात यांनी केला..

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!