जयहिंद व वनराईच्या माध्यमातून पाणलोट विकास कामांना अधिक गती — महसूल मंत्री थोरात
संगमनेर तालुक्यात पेमगिरी सह १५ गावांमध्ये आदर्श ग्राम अंतर्गत कामांना सुरुवात

प्रतिनिधी —
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातून सुरू केलेली दंडकारण्य अभियान ही चळवळ राज्याला दिशादर्शक ठरली आहे. असेच आदर्शवत काम राज्यभरात वनराईच्या माध्यमातून होत असून जय हिंद लोक चळवळी ने दत्तक घेतलेली १५ गावे ही विविध विकास कामांमधून सदृढ ग्राम होणार असून जयहिंद व वनराईच्या माध्यमातून पाणलोटाच्या कामाला अधिक गती मिळेल असा विश्वास जय हिंद लोकचळवळीचे मार्गदर्शक व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

जयहिंद लोकचळवळ, क्रॉम्प्टन मुंबई, वनराई पुणे, यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या पेमगिरी गावात तसेच जयहिंद लोकचळवळने दत्तक घेतलेल्या संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा, मिर्झापूर, नांदुरी दुमाला या गावांमध्ये पाणलोट विकास कामांचा शुभारंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पेमगिरी येथे पार पडला.

यावेळी जयहिंद लोकचळवळचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे, वनराई संस्थेचे अध्यक्ष रविंद्र धारिया, विश्वस्त सागर धारिया, ॲड. माधवराव कानवडे , जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मीरा शेटे, उपसभापती नवनाथ अरगडे, जि. प. सदस्य रामहरी कातोरे ,मिलिंद कालवडे, पांडुरंग घुले, सोमनाथ गोडसे, रावसाहेब डूबे ,शांताराम डूबे, मारुती कवडे, विलास कवडे, नानासाहेब कानवडे यांसह जयहिंद चे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून आमदार डॉ. तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुक्यामध्ये सदृढ ग्राम हा प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील १५ गावांची निवड झाली आहे. वनराई व क्रॉम्प्टन ग्रुप च्या सहकार्याने पाच कोटींची कामे होणार असून पहिल्या टप्प्यात ७० टक्के निधी विविध गावांवर खर्च केला जाणार आहे. आदर्शगाव योजनेतून संगमनेर तालुक्यात अनेक कामे उभी राहिली असून पाणलोटाच्या माध्यमातून जलसंधारणाचे आणखी काम उभे राहणार आहे. स्व. मोहन धारिया यांच्या नेतृत्वाखाली वणराई संस्थेने या क्षेत्रात राज्यभरात मोठे काम उभे केले आहे. संगमनेर तालुक्यातही या विविध गावांमध्ये त्यांच्याकडून होणाऱ्या कामांमुळे पाणलोट कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार तांबे म्हणाले की, जयहिंद ही केवळ एक सेवाभावी संस्था नसून ही लोकचळवळ आहे. सुदृढ समाज निर्मितीच्या निर्धाराने सर्व वयोगटाच्या स्त्री-पुरुषांना संघटित करून, त्यांच्या सहाय्याने लोकांना बरोबर घेऊन हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे जयहिंद सुदृढ ग्राम ने सुरु केलेल्या विविध विकास कामांमुळे जयहिंद आदर्श ग्राम ही संकल्पना देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

रवींद्र धारिया म्हणाले की, संगमनेर तालुक्यात पाणलोटाचे मोठे काम उभे राहिले आहे .जलसंधारणातून या गावात तालुक्याने मोठी प्रगती साधली आहे. या तालुक्यातील १५ गावांमध्ये जयहिंदच्या सहकार्यातून काम करण्यास वनराई संस्थेत निश्चित आनंद होत आहे. पेमगिरी हा ऐतिहासिक भाग असून या ठिकाणी जलसंधारणाच्या कामातून पुढील काही वर्षात मोठा बदल दिसेल असे ते म्हणाले.

याप्रसंगी याप्रसंगी बाळासाहेब कानवडे, मीनानाथ शेळके, द्वारकाताई डूबे, शिवाजी वलवे, संदीप गोपाळे, सखाराम शेरमाळे, सारंग पांडे, तहसीलदार अमोल निकम, निखिल पापडेजा, विष्णू डूबे, भाऊराव कोल्हे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर .आर. पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय डूबे व संदीप डूबे यांनी केले तर सोमनाथ गोडसे यांनी आभार मानले..
