संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण —
राजकारण – पक्ष, जात, धर्म सर्व बाजूला ठेवून गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा करा — डॉ. जयश्री थोरात
महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्याने कडक कायदे करा
संगमनेर | प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील तेरा वर्षाची मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्यावर अज्ञात इसमाने ॲसिड हल्ला केला. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी असून राजकारण पक्ष जात धर्म सर्व बाजूला ठेवून गुन्हेगाराचा तातडीने शोध लावून त्याला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करताना सरकारने महिलांच्या सुरक्षा बाबत प्राधान्याने कडक कायदे केले पाहिजे अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे.
वडगाव पान येथील लहान मुलीवर झालेल्या हल्ल्याची बातमी कळताच डॉ. थोरात यांनी तातडीने तिची प्रवरा मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली याचबरोबर कुटुंबीयांना धीर दिला.

यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्या संतप्त होऊन म्हणाल्या की, झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे अवघ्या तेरा वर्षाच्या लहानग्या चिमुकलीवर ॲसिड हल्ला होतो आहे हे किती वाईट आहे. ईश्वरीच्या वडिलांचे निधन झालेले आहे. आई अत्यंत गरीब आहे. ही मुलगी मामाकडे राहते. शिक्षण घेते आणि असे असताना शाळा सुटल्यानंतर घरी जाताना रोड वरून कोणीतरी अज्ञात इसमाने या निष्पाप मुलीवर ॲसिड ने हल्ला केला. ही काय दहशत आहे.
राजकारण पक्ष जात धर्म सर्व बाजूला ठेवून अशा गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगार शोधण्यासाठी सर्व नागरिकांनी मदत करावी. प्रशासनाने अधिक सतर्कतेने त्याला तातडीने पकडावे. शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत कठीण कायदे केले पाहिजे म्हणजे जेणेकरून गुन्हे करणाऱ्यांना जरब बसेल.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जिथे महिलांचा सन्मान केला जातो .मात्र महाराजांच्या महाराष्ट्रात महिला आणि मुलींचा असा अपमान होत असेल तर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय बाब आहे.
आपण मुलींना विविध क्षेत्रांमध्ये पुढे आणण्यासाठी काम करत आहोत. संधी देत आहोत. मात्र अशा घटना झाल्या तर त्या मुली काय करतील. कशी समानता येईल. कशा मुली पुढे जातील ही सर्व परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

काल संगमनेर तालुक्यातील पठार भागात एका गावामध्ये एका मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर चाकू हल्ला होतो, आज तेरा वर्षीय चिमुकलीवर ॲसिड हल्ला होतो. काय दोष आहे या मुलींचा ? समाजाने जागृत झाले पाहिजे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
वडगाव पान येथील लहानग्या मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातून तीव्र निषेध होत आहे.
