प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही — आमदार सत्यजित तांबे
संगमनेर मधील प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराविरोधात जनता आक्रमक
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये छोट्या सिद्धेश कडलगचा जीव गेला. त्याचे वडील सुरज कडलगसह नागरिक रस्त्यावर आले. मात्र प्रांत अधिकारी एसी मध्ये बसून आचारसंहितेचे कारण देत निवेदन स्वीकारण्यासाठी येत नव्हते. यामुळे आमदार सत्यजित तांबे व डॉ जयश्री थोरात चांगल्याच आक्रमक झाल्या. आमदार तांबे यांनी प्रशासनाला जोरदार इशारा देताच प्रांतअधिकारी अरुण उंडे यांनी जनतेमध्ये येऊन निवेदन स्वीकारले.
संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली असून यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे याचबरोबर एका वर्षामध्ये 12 नागरिकांचा मरण पावले असून सातत्याने बिबट्यांची हल्ले होत आहेत. यावर प्रभावी उपाययोजना करावी याकरता माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्री थोरात यांच्यासह तालुक्यातील नागरिक महिला युवक यांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मोर्चा पार पडला.

मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी यायला तयार नव्हते त्यामुळे आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात चांगल्याच आक्रमक झाल्या.
यावेळी आमदार तांबे म्हणाले की, बिबट्यांच्या दहशतमुक्ती विरोधाचे हे आंदोलन राजकीय नाही यामध्ये कुणाचा स्वार्थ नाही. ज्यांचा मुलगा डोळ्यादेखत उचलून नेला ते सुरज कडलगआणि सर्व समाज एकत्र आला आहे. या आंदोलन फक्त फोटोसाठी किंवा शोबाजीसाठी नाही, तर न्याय मिळवून देण्यासाठी आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आहे. जोपर्यंत शासनाचे प्रमुख अधिकारी येत नाही तोपर्यंत जागा कोणी सोडणार नाही. माझा जन्मच आंदोलनातून झाला आहे. आम्हाला जास्त आक्रमक व्हायला लावू नका अन्यथा कार्यकर्ते तुमच्या कार्यालयात घुसतील असा इशारा देताच प्रांत अधिकारी तातडीने कार्यालयाच्या इमारतीतून खाली आले.

तर डॉ जयश्री थोरात म्हणाल्या की, मी राजकीय पक्षाची कार्यकर्ती म्हणून नाही तर एक आई म्हणून आलेली आहे. ज्यांचे मुले मृत झाले त्यांची काय अवस्था आहे. हे प्रशासनाने समजून घ्यावे. थोडी तरी संवेदनशीलता दाखवा असे आव्हान करताना जनतेमध्ये या महिलांचे प्रश्न समजून घ्या. असा इशारा दिला.

आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची आक्रमक रूप पाहून उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रांताधिकार्यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, वनविभागाचे सागर केदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे ? हे खपवून घेणार नाही..
आम्ही राजकीय कार्यकर्ते असलो तरी आम्हाला संस्कार आहेत. अधिकाऱ्यांशी संयमाने आणि चांगले वागणे ही आमची संस्कृती आहे. आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका. माझा जन्मच आंदोलनामधून झाला आहे. प्रांताधिकारीच काय मग यापुढे जिल्हाधिकारी, मंत्री आले तरी हलणार नाही. असा सज्जड इशारा दिल्यानंतर मात्र प्रशासन नमले. याचबरोबर प्रशासन कुणाच्या दबाव खाली काम करत असेल तर ते खपवून घेणार नाही असाही इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या आक्रमक स्टाईलने प्रशासनाला दिला.
