श्रमिक दूधला धांदरफळ येथे देण्यात येणाऱ्या 33 केव्ही विद्युत वाहिनीचे काम वादग्रस्त !
महावितरणचे अधिकारी बेकायदेशीरपणे विद्युत वाहिनी जोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप
विद्युत वाहिनी जाणाऱ्या अनेक गावातील सरपंच, ग्रामस्थांचा विरोध पैसा आणि पोलिसांचे बळ दाखवून विरोध दडपण्याचा प्रयत्न
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 1
संगमनेर शहरामध्ये असणाऱ्या वीज केंद्रातून धांदरफळ शिवारात असलेल्या श्रमिक दूध या खाजगी दूध संस्थेस 33 केव्ही विद्युत वाहिनी देण्याचे काम सध्या महावितरण कंपनीकडून सुरू आहे. हे काम वादग्रस्त ठरत असून ग्रामस्थ ग्रामपंचायत विरोध करीत असून देखील संबंधित अधिकारी बेकायदेशीरपणे ही विद्युत वाहिनी नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ग्रामस्थांवर पैसा आणि पोलीस बाळाचा दबाव आणून विरोध दडपण्याचे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. शिवाय विद्युत वाहिनी नेताना नियमांचे उल्लंघन करून थेट निळवंडे संगमनेर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवरच विद्युत वाहिनीचे पोल उभे केले असल्याचे देखील समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून येथील बड्या श्रमिक उद्योग समूहाच्या दूध इंडस्ट्रीला उच्च व चांगल्या दाबाने वीज पुरवठा व्हावा यासाठी धांदरफळ शिवारापर्यंत 33 केवी विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाचे खांब (पोल) उभारण्याचे काम सुरू झाले असून चिखली राजापूर गुंजाळवाडी व इतर परिसरातील ग्रामस्थांनी त्यास विरोध केला असला तरी त्यांना न जुमानता महावितरणचे अधिकारी जबरदस्तीने ही विद्युत वाहिनी टाकत असल्याचे बोलले जात आहे.

मुळात अशी विद्युत वीज वाहिनी शहरातून ग्रामीण भागात नेता येते का किंवा अशी विद्युत वाहिनी नागरी वस्ती मधून आणि सर्वसामान्य नागरिकांना व शेतीला धोकादायक ठरेल अशा भागातून नेता येते का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महावितरणचा मनमानी कारभार आणि अधिकाऱ्यांची मजुरी त्यामुळे चव्हाट्यावर येत असून अधिकारी नियमाचे पालन करीत नसल्याचे आरोप ग्रामस्थ करतात

या संदर्भात महावितरण कंपनीने ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायतींना अंधारात ठेवून ही विद्युत वाहिनी टाकण्याचे काम केले असल्याचे देखील सांगितले जाते. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे आणि एका खाजगी संस्थेसाठी एवढा आटापिटा का चालला आहे? याबाबत ग्रामस्थांकडून विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत.
