संगमनेरात आता गुळात भेसळ !
गेल्या वर्षभरात सात ठिकाणी छापे ; ठोस कारवाई नाही
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 13
संगमनेर शहर आणि तालुक्यात मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने तालुक्यात विविध ठिकाणी कारवाया केल्या आहेत. छापे टाकले आहेत. संशयित पदार्थांचे नमुने घेतले आहेत. मात्र अद्याप पर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे दिसत असून आता संगमनेरात गुळामध्ये भेसळ असल्याची तक्रार देखील करण्यात आली असून संबंधित विभाग या संदर्भात काय कारवाई करतो याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.


संगमनेरातील रहिवासी शंकर ढमाले यांनी अन्न व औषध विभागाकडे सविस्तर तक्रार करून त्यांना एका विशिष्ट कंपनीचा गूळ खाल्ल्यानंतर त्रास झाला असून गुळातील काही रासायनिक पदार्थांमुळे त्रास झाल्याने थेट रुग्णालयात दाखल होऊन उपचार करावे लागले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार एकदा नव्हे तर दोनदा झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित विभागाला दिलेल्या तक्रारीत ढमाले यांनी म्हटले आहे की, गूळ खाल्ल्यानंतर पोटात प्रचंड वेदना झाल्या. त्यानंतर औषधे गोळ्या खाल्ल्यानंतर बरे वाटले परंतु या आधी सुद्धा गुळ खल्ल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागण्याचे लक्षात आले व अन्नातून विषबाध झाल्याचा प्रकार असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.

त्यामुळे हा प्रकार गूळ खाल्ल्याने होत असल्याचे त्यांचे मत झाले आहे त्यामुळे संगमनेर येथील “सिद्धी नैसर्गिक गुळ” याचे विक्रेते व निर्माते मोहनलाल बन्सीलाल दर्डा या दुकाना विरुद्ध त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे सविस्तर तक्रार केली असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. व सदर गुळाची तपासणी करावी गुळामध्ये कृत्रिम रंग आणि डिटर्जंट पावडरचा वापर केला जात आहे असे अर्जात म्हटले आहे. गुळाचे नमुने देखील त्यांनी स्वतःजवळ ठेवले आहेत.

संगमनेर शहर व तालुक्यात सातत्याने अन्न भेसळीचे प्रकार पुढे येत असल्याने त्याबाबत गांभीर्यान कारवाई होण्याची आवश्यकता आहे. नावाजलेली गाजलेली मिठाईची दुकाने, किराणा दुकाने तेल गूळ खवा अशा अन्नपदार्थांमध्ये भेसळीच्या विविध तक्रारी झालेल्या आहेत. संशयित पदार्थाचे नमुने घेण्यात आले आहेत. मात्र ठोस कारवाई अध्यापर्यंत झालेली नाही.
