शेतकऱ्यांचा ४६ कोटींचा पिक विमा मंजूर

जीवन ज्योत फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ४४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

नेवासा प्रतिनिधी दि. 13 – 

वारंवार निसर्गाच्या कोपाचा सामना करत असलेल्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय समोर आला आहे. शासनाने तालुक्यातील पिक नुकसानीसाठी एकूण ४६ कोटी ५२ लाख २१ हजार ३३८ रुपये इतक्या रकमेचा पिक विमा मंजूर केला आहे. ४४,२४३ शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, त्यापैकी सुमारे ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाली आहे. उर्वरित रक्कमही लवकरच वितरित होणार असल्याची माहिती जीवन ज्योत फाउंडेशनचे संस्थापक कमलेश नवले पाटील यांनी दिली आहे.

निसर्गाच्या लहरीपणात अडकलेले शेतकरी – विमा झाला आशेचा किरण

अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या काही वर्षांपासून नेवासा तालुक्यातील शेती संकटात सापडली आहे. कधी सोयाबीन नष्ट, कधी कापूस पिकांचे नुकसान, तर कधी फळबागांचे उत्पादन ठप्प – यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणात मोठी वाढ झाली होती. अन्नदाता म्हणवणारा शेतकरी स्वतःच उपासमारीच्या छायेखाली गेला होता. अशा परिस्थितीत पिक विमा योजना हीच त्यांच्या अस्तित्वाची शेवटची आशा ठरली होती.

जीवन ज्योत फाउंडेशनचा निर्णायक हस्तक्षेप

या निर्णयामागे जीवन ज्योत फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा अतुलनीय वाटा आहे. फाउंडेशनने तालुक्यातील शेकडो गावांतील शेतकऱ्यांच्या तक्रारी गोळा करून त्यांची छाननी केली, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज पुन्हा सादर केले. विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा, प्रशासनाशी वेळोवेळी बैठक, आणि शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा हे सारे काम नियोजनबद्ध रीतीने करण्यात आले.

कमलेश नवले पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य हक्क मिळालाच पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. पिक विमा योजना ही कागदांपुरती न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या उपयोगी पडावी, यासाठी आम्ही झटलेलो आहोत. आज हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, हेच आमचं समाधान.”

अजूनही काही शेतकरी प्रतीक्षेत – पुढील टप्प्यात वितरण होणार

विमा मंजुरीच्या या निर्णयातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असला, तरी अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायची आहे. जीवन ज्योत फाउंडेशन संघटनेने अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून ती शासनाच्या संबंधित विभागांकडे सादर केली आहे. “कोणताही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहता कामा नये,” ही भूमिका घेऊन पुढील प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

आशेची किरणे पेरणारी एक यशोगाथा

नेवासा तालुक्यातील ४६ कोटींच्या पिक विमा मंजुरीमुळे हजारो कुटुंबांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ही फक्त आर्थिक मदत नाही, तर संकटातून उभारी देणारी एक नवी सुरुवात आहे. प्रदेश अध्यक्ष नरेंद्र नवथर,अक्षय बोधक,राहुल कांगुणे,आप्पासाहेब आरगडे,प्रदीप आरगडे,विजय खरात,अभिजीत बोधक,रोहित रुईकर,अमोल जोगदड,महेश नवले,अक्षय आरगडे,प्रतिक आरगडे,तोफीक शेख,अॅड.पांडुरग औताडे,ऋषी तागड,संजय ठुबे, दिपक नवले व सर्व सहकारी मित्र परिवार,कायदेशीर सल्लागार व शेतकरी बांधव यांच्या पाठिंबा यामुळे योजना केवळ कागदावरच नाही, तर प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वी होऊ शकतात, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. ही यशोगाथा इतर तालुक्यांसाठी आदर्श ठरू शकते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!