संगमनेर शहरातील मटका अड्डे आणि इतर अवैध धंदे तात्काळ बंद करा !
हिंदुत्ववादी युवकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत...नाहीतर… मोर्चा — आंदोलन
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 18
संगमनेर शहरातील हनुमान जयंती उत्सव प्रकरणी हिंदुत्वादी युवकांवर केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी तथा संगमनेर शहरातील अवैध धंदे मटका अड्डे व इतर अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी आणि ललित परदेशी यांची फिर्याद घेण्यासाठी संगमनेर शहरातील नागरिकांच्या युवकांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास 22 एप्रिल 2025 रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील अवैध धंदे मटका अड्डे, जुगार क्लब, गुटखा, अवैध देशी विदेशी दारू विक्री बंद करणे बाबत तथा राजकीय सूडबुद्धीने प्रेरित झालेल्यांच्या दबावात येऊन पोलीस प्रशासनाने हिंदुत्ववादी युवकांवर खोटे अतिरंजितपणे दाखल केलेलेे गुन्हे मागे घेण्यात यावेत.
संगमनेर शहरांमध्ये सध्या अवैध व्यवसायाचा सुळसुळाट सुरू झालेला आहे. चौका चौकात असलेले मटक्याचे अड्डे, अवैधरित्या गुटखा विक्री, लोटो गेम, पत्याचे क्लब, देशी-विदेशी दारू विक्री, वाळू तस्करी गौण खनिज तस्करी वाहतूक खुल्या प्रमाणात सर्रासपणे सुरू आहे. यामुळे संगमनेरची शांतता व सुव्यवस्था भंग होत आहे. आणि संगमनेर मध्ये हिंदू-मुस्लीम तणाव देखील वाढत आहे. आता तर ह्या अवैध धंद्यामुळे संगमनेर मधील हिंदू युवकांमध्येच वाद निर्माण झालेले आहेत.

संगमनेर शहर व तालुक्याची संस्कृती व इतिहास लक्षात घेता प्रत्येक सण उत्सव परंपरा मोठ्या उत्साहात एकोप्याने करण्याचा समृद्ध वारसा संगमनेरकरांनी जपला. सुप्रसिद्ध असलेला सार्वजनिक गणेशोत्सवा सोबतच शिवजयंती, श्रीरामनवमी, हनुमान जन्मोत्सव, डॉ.आंबेडकर व महात्मा फुले जयंती अश्या विविध उत्सवांनी संगमनेरचे वातावरण भारून जाते. विविध मंडळे व समित्यांचे कार्यकर्ते हे भाविक भक्तांच्या आणि व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्या सहकार्यातून हे मोठे उत्सव गुण्या गोविंदाने पार पाडतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरमधील वातावरण हे जाणूनबुजून दुषित करुन इथे राजकीय दहशतीचे वातावरण करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचे स्वप्न काही झारीतील शुक्राचार्य पाहत असून त्यासाठी प्रत्येक उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न काही विकृतांनी चालवला आहे.

गाव मारुती व गाव उत्सव नावाने संगमनेर शहर व तालुक्यातून हनुमान जयंती निमित्त वर्गणी गोळा करायची व स्वतःचा वैयक्तिक उत्सव असल्याचा कांगावा करायचा हे कितपत योग्य आहे? तसेच वाद करणाऱ्या मध्ये, दहशत करणाऱ्या मध्ये शंभर टक्के संगमनेर मधील अवैध व्यवसायिकांचा सहभाग असतो. अवैध व्यावसायिक टोळी निर्माण करून संगमनेर मध्ये सतत दहशत निर्माण करतात. यात मटका, जुगार क्लब अवैध देशी विदेशी दारू तसेच गुटखा तस्करी मध्ये लाखोंची माया जमवलेले संगमनेरच्या सण उत्सवात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतात. सदर अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावेत. हे अवैध वसायिक कायम वाद करून दहशत निर्माण करत असतात. शिवजयंती उत्सवा दरम्यान बस स्थानक परिसरातील वाद असो, श्रीरामनवमी दरम्यान उपनगरातील मंडळांना दिलेला त्रास असो किंवा हनुमान जन्मोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक रथउत्सवात मुद्दामहून घडवून आणलेले वादाचे प्रकरण असो एकीकडे निवडणुकीपुरता हिंदूंना “एक हे तो सेफ हे” चे नारे देऊन मत लाटायचे व निवडून आल्यावर हिंदू युवकांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवायचे हा कुठला हिंदुत्ववाद?

हनुमान जयंती उत्सव हा गावोत्सव आहे. कारण या उत्सवासाठी अख्या गावातून वर्गणी काढली जाते. हा कोणत्याही खाजगी व्यक्तीचा उत्सव नाही. हिंदुराजा ढोल पथकाने गेल्या दहा ते बारा वर्षापासून सुरु असलेल्या रथाला वाद्यांची सलामी द्यायची परंपरा सुरू ठेवण्यासाठी वादनासाठी आलेल्या ढोल पथकातील वादकांना गावठाणातीलच काही तरुणांनी केवळ राजकीय मतभेद असल्याने विरोध केला. त्याचा परिणाम सामान्य भांडणात झाला त्या वेळी उपस्थीत असलेले लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्या समोरच हे प्रकरण घडले व ते जागेवर मिटवले देखील परंतु सर्व प्रकरण मिटवल्या नंतर काहींची विकृती जागी झाली व ढोल पथकातील वादकांसह उपस्थित हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि वाद मिटवण्याचे प्रयत्न करणाऱ्या सुज्ञ नागरिकांवरच अतिरंजितपणे रंगवलेल्या तक्रारीवरून खोटे गुन्हे लादण्यात आले. सदरील प्रकरणात पोलीस कर्मचारी स्वतः उपस्थित होते तरीही असे खोटे गुन्हे दाखल कसे झाले? कोणाच्या राजकीय दबावापोटी हे गुन्हे दाखल करण्यात आले? केवळ स्वतःचे वैयक्तिक वाद हे संपूर्ण चौकाच्या आणि गावाच्या उत्सवात आड आणून वैयक्तिक आकसापोटी राजकीय ताकदीचा गैरवापर करून हे खोटे गुन्हे काहींनी मुद्दाम लादले असून अश्या प्रवृत्तीच्या विरोधात हिंदुत्ववादी व शिवप्रेमी युवक आता शांत बसणार नसून हे गुन्हे तत्काळ मागे न घेतल्यास शनिवार 22एप्रिल 2025 रोजी सायंकाळी मोठ्या प्रमाणात सर्व युवकांना घेऊन मोर्चा आंदोलनाचे आयोजन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील.

तसेच ललित परदेशी यांना हनुमान जयंती उत्सव निमित्त झालेली मारहाण शिवीगाळ गंभीर स्वरूपाची असल्याने त्याने दिलेल्या तक्रारीवरून फिर्याद दाखल करून घेण्यात यावी ही विनंती करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते युवक उपस्थित होते.
