माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटात जाणार !
शिरूर लोकसभा मतदारसंघात चर्चा रंगली आहे
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
अजित पवारांनी शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिल्यापासून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज झाले आहेत. मंचरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत आढाळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमालादेखील विलास लांडे दिसले नाहीत. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट झाली. मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदा ही लांडेंना डावलण्यात आल्यानं ते कमालीचे नाराज आहेत. पुढची भूमिका मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे.

या पूर्वी लांडेंनी माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीरपणे मांडलेली आहे. पण गेल्या आठवड्यात शिरूर लोकसभेत झालेल्या बैठकीवेळी आढळरावांना उमेदवारी देणार असून तुम्हाला त्यांचा प्रचार करावा लागेल, असा आदेश अजित पवारांनी दिला तेंव्हापासून मात्र लांडे माध्यमांना टाळतायेत. जणू ते गायबच झालेत, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालीये. यामुळं विलास लांडे आता यावेळी शिवाजी आढळरावांचा प्रचार करणार की नाही? की, अमोल कोल्हेंच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारा, या शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार? याकडे शिरूर लोकसभेतील जनतेचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयात उमेदवाराला साफ नापसंती दर्शवली होती. त्यासोबतच कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा नावासाठी पक्षाकडे मागणी केली जात होती. मात्र आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि अजित पवारांनी आढळराव पाटलांना विजयी करण्यासाठी आवाहन केलं. गेली अनेक वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी लोकसभा लढलो आहे. मी १० वर्ष आमदार होतो, महापौरही होतो. त्यामुळे मी कुठे कमी पडत आहे असा सवाल करीत माझी विनंती आहे की, आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असे विलास लांडे यांनी मत मांडले होते. मात्र तरीही त्यांना डावलण्यात आलं आणि आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली. या मुळे विलास लांडे फारच नाराज झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता विलास लांडे शरद पवार गटात जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
