संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात बांधल्या शेकडो गायी !
दूध प्रश्नी आमरण उपोषणाचा ६ वा दिवस !
संगमनेर दि.
दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी, गेल्या ६ दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने ६ दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष करत असल्याने श्री. संदीप दराडे व अंकुश शेटे यांनी सुरू केलेल्या उपोषणात बेमुदत अन्नत्याग करत डॉ. अजित नवले यांनी उपोषणास सुरुवात केली असून आज संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात शेकडो गायी आणून बांधल्या आहेत.

दुधाचे दर कोसळल्याने महाराष्ट्रभरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने आदेश देऊनही सहकारी व खाजगी दूध संघांनी हा आदेश पाळण्यास दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत नकार दिला आहे.

अकोले येथे सुरू असलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा मिळत असून सरकारने तातडीने या प्रश्नात ठोस तोडगा काढावा असे आवाहन दूध उत्पादकांनी केले आहे. उपोषणास शेकडो ग्रामपंचायती व दूध संकलन केंद्रांनी ठराव करून पाठिंबा दिला आहे. आंदोलन स्थळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, आजी, माजी आमदार व खासदार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. दुधाला ३४ रुपये भाव जोवर मिळत नाही व दुध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटमारी, खाजगी संस्थांना लागू असणारा कायदा आदी प्रश्नी कार्यवाही केल्या शिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले आहे.

मिलिंद नाईकवाडी, डॉ. मोहन पवार, तुळशीराम कातोरे, महेश सोनवणे, राम एखंडे, शुभम आंबरे, भीमाशंकर मालूंजकर, सुनील लोखंडे, नितीन डुंबरे, निलेश गवांदे, दीपक पथवे, संदीप शेणकर, राहुल शेटे, किशोर शिंदे, सत्यम भोर, अतुल लोहटे, संतोष भोर, राजेंद्र भोर, माणिक पांडे, नानासाहेब धुमाळ आदी दूध उत्पादक आंदोलनाचे संचालन करत आहेत.

