जयहिंद मुळे युवकांना व्यवसाय विकासाची संधी – डॉ आनंद गोडसे
व्यवसाय हा प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य देतो – आमदार सत्यजित तांबे
जयहिंदच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस युवकांचा मोठा प्रतिसाद
प्रतिनिधी —
संगमनेर मध्ये व्यवसाय वृद्धीसाठी तरुणांना मोठी संधी आहे. नवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देत उद्दिष्ट ठेवून काम केल्यास यशस्वी उद्योजक होता येते. युवकांना व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी जयहिंद लोक चळवळीमुळे मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे गौरवउद्गार डॉ. आनंद गोडसे यांनी काढले आहे. तर व्यवसाय हा प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य देत असल्याचे प्रतिपादन युवा आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

मालपाणी लॉन्स येथे जयहिंद लोकचळवळ व दे असरा या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, पुणे येथील प्रशिक्षक डॉ.आनंद गोडसे व ऐश्वर्या कुलकर्णी, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.

गोडसे म्हणाले की, नोकरीच्या संधी दिवसेंदिवस कमी होत असून युवकांनी उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे. या क्षेत्रात प्रत्येकाला मोठी संधी आहे मात्र मार्केटची स्थिती आपली क्षमता ओळखून व्यवसाय निवडावा.

आमदार तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून युवकांपुढे आदर्श उभा केला. रयतेचे स्वतःचे राज्य त्यांनी निर्माण केले व्यवसाय मधून प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळते.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीतून कारखाना दूध संघ शैक्षणिक संस्था या माध्यमातून तालुक्याची आर्थिक प्रगती साधली असून आज यामुळे विविध क्षेत्रात ८० हजार लोकांना रोजगार मिळाले आहेत. शेती सुद्धा हा व्यवसाय असून नवीन कल्पना शेतीमध्ये रुजवली तर प्रत्येकाला मोठे यश मिळेल असेही ते म्हणाले

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, निकोप व निरोगी समाज निर्मितीसाठी जय हिंद लोक चळवळ काम करत असून मागील पंचवीस वर्षात सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या असून त्यावर मात करण्यासाठी युवकांना स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन व्हावे यासाठी असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, संगमनेर हे शिक्षण व आरोग्याचे मोठे हब असून मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे वार्षिक सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल तालुक्यातून होत असल्याने तरुणांना व्यवसायासाठी मोठी संधी आहे.

ऐश्वर्या कुलकर्णी म्हणाल्या की, प्रत्येकाला दिवसभरात वेगवेगळ्या आयडिया येतात त्या आयडिया चे रूपांतर व्यवसाय ज्याला करता आले तो यशस्वी उद्योजक होऊ शकतो.
कार्यक्रमाचे स्वागत कमलेश उनवणे यांनी केले सूत्रसंचालन गणेश गुंजाळ व नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ. अभयसिंह जोंधळे यांनी आभार मानले..

महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी शिबिर
युवक व युवतींचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी संगमनेर मध्ये उद्योजकता व व्यवसाय प्रशिक्षण शिबिर होणार असून यामध्ये अधिकाधिक युवकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

