संगमनेर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी आनंद हासे

सचिव पदी मधुसुदन करवा यांची निवड

प्रतिनिधी —

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब संगमनेरचा ४० वा पदग्रहण समारंभ मालपाणी लॉन्स येथे पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून आनंद किसन हासे व सचिव म्हणून मधुसुदन चंद्रकांत करवा यांनी जबाबदारी स्विकारली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सत्यजित तांबे, क्षितीज झावरे, उद्योजक राजेश मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. मावळते अध्यक्ष ऋषिकेश मोंढे यांनी आपण वर्षभर केलेल्या कामांची चित्रफीत दाखविली व केलेल्या कामांचा आढावा आपल्या भाषणात घेतला. यानंतर रोटरी आय केअर ट्रस्टचे अध्यक्ष संजय राठी यांनी नेत्र रुग्णालयामार्फत वर्षभर केलेले काम व भविष्यात करावयाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.

नूतन अध्यक्ष आनंद हासे यांनी यावर्षी राबविण्यात येणाऱ्या ग्रामपरिवर्तन प्रोजेक्टची विस्तृत माहिती दिली, यावर्षी ग्लोबल ग्रँटच्या मदतीने समाजासाठी उपयुक्त असे मोठे प्रोजेक्ट राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. तसेच सर्व नुतन टिमचे आभार मानले. यावेळी त्यांनी आजपर्यंत रोटरीमध्ये केलेल्या कामाची चित्रफीत दाखविण्यात आली.

क्षितीज झावरे यांनी रोटरी यावर्षी जे प्रकल्प राबविणार आहे त्याची माहिती दिली. तसेच स्वाती हेरकळ यांचा संदेश पोहचविला. माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी संगमनेर रोटरी डोळ्यांच्या क्षेत्रात करीत असलेल्या कामाची प्रशंसा केली. उद्योजक राजेश मालपाणी यांनी स्वार्थ विरहीत सेवा कशी करावी हे रोटरीकडून शिकावे असे सांगितले. ४० वर्षांच्या रोटरीच्या कामाचे त्यांनी ‘फोर्टी’ स्वरुपात अतिशय सुंदर वर्णन केले. तसेच यापुढेही रोटरीला शक्य ती सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

अध्यक्षीय भाषणात आमदार सत्यजित तांबे यांनी जगभरात रोटरी क्लब करीत असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात संगमनेर रोटरी क्लबचे काम सर्वांत उत्तम असल्याचे गौरोद्गार काढले. यावेळी संगमनेरमध्ये कार्यरत असलेल्या विविध सेवाभावी संस्था व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी शहरातील मान्यवर, रोटरी क्लब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुदीप हासे व सौरभ म्हाळस यांनी केले. तर आभार सचिव मधुसुदन करवा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली.

रोटरीतर्फे नाईक दाम्पत्याचा विशेष गौरव

कार्यक्रमात डॉ. मुकुंद नाईक व वैशाली मुकुंद नाईक यांचा ‘रोटरी सेवा जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. एसएसवायच्या माध्यमातून संगमनेर शहरातील अनेकांच्या जीवनात त्यांनी सकारात्मक बदल घडवून आणले आहे. गेली २० वर्षे त्यांचे हे कार्य निरपेक्षपणे आणि अव्याहतपणे सुरु आहे. एसएसवायचे अनेक साधक संगमनेर शहरात कार्यरत असून संगमनेरमधील नागरीकांचे शारीरीक व मानसिक स्वास्थ्य सुधरवण्यासाठी ते विशेष प्रयत्न करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!