संगमनेर बस डेपो कार्यालयाला टाळे ठोकण्याचा छात्रभारतीचा इशारा !
प्रतिनिधी —
कोविड संक्रमणानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जाणारी काही गावांची, खेड्यांवरची बस सेवा बंद आहे. तर काही बस फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही संगमनेर बस आगाराकडून कुठलीही सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात सर्व बस सेवा पुर्ववत केल्या नाही तर संगमनेर बस आगार प्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा छात्रभारती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड१९ नंतर संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील बस बंद केल्या आहेत. या बाबत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आगार प्रमुख याना वेळोवेळी निवेदन दिले आहे. याबाबत आंदोलनही केले आहे. तसेच सातत्याने सवांद साधला जात असतानाही सतत उडाउडीची उत्तरे, खोटे आश्वासन दिले जात आहे.

अनेक ठिकाणी पूर्वी सुरु असलेल्या बस बंद केल्या आहे. या मुळे हजोरो मुला मुलींचे शिक्षण बंद झाले आहे. विद्यार्थ्यांना बस पासचा लाभ घेता येत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागत आहे. अनेक मुलांना जीव धोक्यात घालून खासगी चालू वाहनांने प्रवास करावा लागतो. या मध्ये मुलीच्या सुरक्षेतेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे .

बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी राहावे लागत आहे. मेस व रूम साठी नाहक पैसे मोजावे लागत आहेत. पठार भागासह अनेक गावातील मोठ्या प्रमाणात फेऱ्या बंद केल्या आहेत. नेहमी राजकीय कार्यक्रम, दिंड्या साठी, सहलीसाठी गाड्या गेलेल्या आहेत. असे सांगत येते. याबत सातत्याने पाठपुरावा करूनही आमच्या कडे गाड्या उपलब्ध नाही असे कारण सांगण्यात येते.

बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी अचानक गाड्या बंद केल्या जातात. पठार भाग व संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील ठिकाणच्या मुक्कामी बसेस व फेऱ्या मुलांना शाळेच्या वेळेतील बसेस तात्काळ चालू कराव्यात. मुलांच्या शैक्षणिक, आर्थिक नुकसानाला बस आगार प्रशासनच जबाबदार आहे. शैक्षणिक नुकसान आपण तात्काळ थांबवावे आणि दोन दिवसात विचार करून अमंलबजावणी करावी. अन्यथा आपल्या कार्यालयाला छात्रभारती च्या वतीने संविधानिक मार्गाने टाळे ठोकण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशारा छात्रभारती ने आगार प्रमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी छात्रभारती चे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य सदस्य गणेश जोंधळे, ओंकार अभंग, सुमित खरात, साहिल खरात, पृथ्वीराज खरात, विशाल जगताप, अवजीनाथ गायकवाड, सिद्धांत धाकतोडे, रुपाली घुले, मनिष फटांगरे, राणी घुले, अनुष्का घुले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सावरगाव घुले सकाळी ९.३० वाजता, जवळे बाळेश्वर सायंकाळी ६.३० वा. मुक्कामी, सारोळे पठार सकाळी ९.३० वाजता, धादडवाडी सायंकाळी ६.३० वाजता मुक्कामी, संगमनेर ते लोहारे सकाळी १० वाजता, संध्याकाळी ५.३० वाजता, कवठे कमळेश्वर दुपारी १२.३० वाजता, सकाळी ६ वाजता, रहिमपूर सकाळी ६.३० वाजता, पिंपळगाव माथा सकाळी ६.३० वाजता सायंकाळी ६.२० वाजता मुक्कामी वरील सर्व बस नियमितपणे सुरू कराव्यात अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आलेली आहे.

