पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर !
प्रतिनिधी —
केंद्र आणि राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या विकासा साठी महत्वाचा आसलेला. पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समजली आहे.

एकूण दोनशे पस्तीस किलोमीटरचा आणि या तीनही जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सुद्धा महत्त्वाचा आणि उपयोगी ठरणार असलेला हा पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प बंद होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

हा सेमी हाय स्पीड रेल कॉरिडॉर प्रोजेक्ट रद्द होऊन त्या ऐवजी आता औद्योगिक महामार्ग होण्याची शक्यता असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर वर्तवली जात असल्याचे समजले. हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे या तीनही जिल्ह्यातील विकासाला खंड पडणार असून औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचे नुकसान होणार आहे.

या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर गेल्या चार वर्षापासून या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्याचे काम सुरू होते. या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मागील महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्याची विनंती केली होती.

निती आयोगाने देखील या कामाला परवानगी दिली आहे. विविध खात्यांच्या परवानग्या आणि तांत्रिक काम जवळजवळ पूर्ण होत आलेले असतानाच आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळणे बाकी असतानाच अचानकपणे हा प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

असे असल्याने जवळजवळ आता भूसंपादनाला सुरुवात होणार होती. काही ठिकाणी ती सुरुवात देखील झाली होती. महारेलला मुख्यमंत्र्यांनी आवश्यक व राहिलेले भूसंपादनाचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एवढेच नाही तर या प्रकल्पासाठी लागणारी बरीचशी जमीन अधिग्रहीत देखील करण्यात आली होती.
परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाच्या मंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकी नंतर हा प्रकल्प बारगळण्याची शक्यता निर्माण झाल्याचे खात्रीलायकरित्या समजले आहे.


सुरुवातीपासूनच पुणे दौंड बारामती याच कोरीडोरला प्राधान्य देण्यात आले व नासिक पुणे कायमच मुद्दामहून दुर्लक्षित ठेवण्यात आले. आता कुठे बदललेल्या राजकीय परीस्थितीत पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे एक आशेचा कीरण ठरत होता, आता त्यालाही खिळ बसल्याचे पाहुन सर्वसामान्यांच्या मनात दुख व राग निर्माण होणं साहजिकच आहे. ्