समृद्ध भारताच्या उभारणीत काँग्रेसचे मोठे योगदान – आमदार बाळासाहेब थोरात
प्रतिनिधी —
विविध जाती, धर्म, वेश, भाषा असलेल्या भारतात सर्वजण स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एकत्र झाले. एकीच्या बळावर स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच देशांने केलेली प्रगती ही जागतिक पातळीवर उल्लेखनीय ठरली असून समृद्ध भारताच्या उभारणीत काँग्रेस पक्षाचेच मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

वडगाव पान येथे तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त कोकणेवाडी ते वडगाव पान या २५ किलोमीटर पदयात्रेच्या आजादी गौरव यात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, मिलींद कानवडे, अर्चना बालोडे, लक्ष्मण कुटे, शंकर खेमनर, लकी जाधव, मीरा शेटे, पद्मा थोरात, बेबी थोरात, महेंद्र गोडगे, सुरेश थोरात, नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, निलेश थोरात, सुभाष सांगळे, सिताराम राऊत, बाळासाहेब गायकवाड, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, आदींसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, महात्मा गांधींच्या सत्य व अहिंसेने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने सर्वांना समतेचा अधिकार दिला. या राज्यघटनेमुळेच गरिबांनाही मोठी किंमत आहे. या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक राष्ट्रपुरुषांनी तुरुंगवास भोगला. पंडित जवाहरलाल नेहरू जीवनातील अकरा वर्ष तुरुंगात राहिले. अनेक राष्ट्रपुरुषांसह तीर्थरूप भाऊसाहेब थोरात, डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनीही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तुरुंगवास भोगला. या सर्वांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळाले आहे. आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाखालीच देश उभा राहिला आहे.

यूपीए सरकारच्या काळात जागतिक मंदी असताना डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक क्षेत्रात भारत समृद्ध राहिला. मात्र २०१४ नंतर भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी अत्यंत भयानक आहे. यावर आवाज उठवला तरी ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणा काम करून विरोधकांचा आवाज बंद केला जात आहे. मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी ही बनवाबनवी सुरू आहे .
सध्या काँग्रेस अडचणीत नसून लोकशाही अडचणीत आली आहे. आपला तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका राहिला आहे. सर्वांनी देशाच्या व तालुक्याच्या विकासासाठी एकजूट होऊन राज्यघटनेच्या विचारांच्या पाठीशी राहिले पाहिजे.

जातीभेदाच्या नावावर मते मिळवणाऱ्या भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा सरकार आले. अत्यंत चांगले काम केले. मात्र भाजपाच्या हुकूमशाहीमुळे आमदारांची पळवा पळवी झाली. आज देशात सर्वत्र एका पक्षाची हुकूमशाही आहे. या विरुद्ध सर्वांनी जागरूक होऊन आवाज उठवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले
हिरामण खोसकर म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने लोकांच्या मध्ये राहून जनतेची कामे केली. म्हणून ते सलग ४० वर्षे आमदार आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या या नेत्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी राहिले पाहिजे. मोदी सरकारने जनतेला फसवले. शेतकऱ्यांना फसवले मात्र शेतकऱ्यांनी आपण नांगर जसा पलटी करतो तसे भाजप सरकारला पलटी करावे असे आवाहन केले.

सत्यजित तांबे म्हणाले की, भाजप हा जातीयतिचे विष पेरून तरुणांची माथी भडकावत आहे. दोन कोटी नोकऱ्यांची खोटे आश्वासन दिले आहे. या भाजीपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीत बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत महत्त्वाचे काम केले. अत्यंत संयमाने सर्वांना बरोबर घेतले. मात्र अनेकांनी सत्तेच्या स्वार्थासाठी सात मिनिटात आपले पक्ष बदलले .पण ही सत्ता जास्त दिवस राहणार नाही.
मिलिंद कानवडे, महेंद्र गोडगे, बाबा ओहोळ, मीरा शेटे, यांचीही भाषणे झाली. यावेळी कोकणेवाडी ते वडगाव पान या पदयात्रेदरम्यान तालुक्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात या पदयात्रेततील कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
