ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ण प्रभावाने सुरू करावी — आमदार राधाकृष्ण विखे पाटील

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होत असलेली अडचण दूर करा
परिवहन मंत्र्यांकडे केली मागणी
प्रतिनिधी —
ग्रामीण भागात बंद असलेली बससेवा पुन्हा सुरू करून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होत असलेली अडचण दूर करा आशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी परीवहन मंत्र्यांकडे केली आहे.
कोव्हीड संकटात ग्रामीण भागातील बससेवा बंद ठेवण्यात आल्याने समान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. नियम शिथील झाल्यानंतर शहरी भागातील बससेवा सुरळीत झाली परंतू ग्रामीण भागातील प्रवाशांना त्याचा लाभ मिळू न शकल्याने जनतेचे अतोनात हाल होत आहेत.

एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपाचा मोठा त्रास प्रवाशांना सोसावा लागला. संप मिटून खूप दिवस झाल्यानंतरही ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरू न केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याची बाब निदर्शनास आणून देतानाच ग्रामीण भागाबाबत असा दुजाभाव का असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.

ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने जेष्ठ नागरिक, महीला, शेतकरी, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच रोजंदरीवर जाणारे कामगार रूग्ण यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, बस सुविधा उपलब्ध नसल्याने खासगी वाहनचालक सामान्य प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात लूट करीत असल्याची बाब आ.विखे यांनी परीवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

पुढील आठवड्यात सर्व शैक्षणिक संस्था सुरू होत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा निर्माण होण्यासाठी बससेवा सुरू होणे अंत्यत गरजेचे असून, अनेक गावात आजही वर्षानुवर्षे रात्री मुक्कामाला जाणाऱ्या बसगाड्या सकाळी शाळा महाविद्यालयात तसेच कामावर जाण्याच्या दृष्टीने सोयीच्या असतात ग्रामीण भागातील बससेवा पुन्हा पुर्ववत सुरू झाल्यास याचा मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय करावा आशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील बस सुरु होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी, नागरीक ग्रामस्थांनी व्यक्तीश: भेट घेवून बस सेवा तातडीने सुरु करण्याबाबतची मागणी केली आहे. तसेच संप मिटल्यानंतर एसटी कामगारांना अद्यापही फे-यांची उपलब्धता करुन दिली जात नाही. प्रवाशांची मागणी असतानासुध्दा परिवहन विभागाकडून होत असलेले दुर्लक्ष अतिशय दुर्दैवी आहे.
