स्वच्छ व सुंदर संगमनेरची ऐशी तैशी !

2.0 चा नुसताच गाजावाजा नको – कृती हवी

 नगरसेवक पद फक्त मिरवायला….

नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध कृत्य करणाऱ्यांचे फावले 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

माध्यमे आणि सोशल मीडिया मधून संगमनेर 2.0 चा गाजावाजा करण्यात येत असला तरी त्याला कृतीची जोड नसल्याने आणि प्रशासनावर कोणतीच पकड अद्याप तरी तयार झाली नसल्याने संगमनेरात अनेक ठिकाणी समस्या जैसे थे आहेत. 

प्रशासकीय काळात स्वच्छ व सुंदर संगमनेरची ऐशी तैशी करण्यास अनेकांनी हातभार लावला आहे. त्यामध्ये सावता माळी नगर मधील सावित्री कॉलनी पासून स्टेडियम मागून पोलीस स्टेशन कडे जाणारा संपूर्ण रस्त्यावर कचरा, माती, पाळीव प्राण्यांचे पिंजरे, मोठमोठाली लाकडे, इमारतीचे सामान, सेप्टिक टाक्या, दगड रॅबिट हे टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड म्हणून उपयोग होऊ लागला आहे. एवढेच नव्हे तर या बाजूची स्टेडियमची मागील भिंत देखील आता फोडायला सुरुवात झाली आहे. अवैध उद्योग करून रस्तेच बंद करण्याचा प्रकार सुरू झाला असल्याने नगरपालिका सत्ताधारी आणि प्रशासन अजूनही किती दुर्लक्ष करणार असा सवाल उपस्थित झाला आहे. 

संगमनेर शहरात कचरा गाड्या घंटा वाजवीत फिरत असल्या तरी शहरातील अनेक भागात उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आढळून येतात. घंटागाड्यावरील कर्मचारी कचरा उचलण्याची साधी तसदी देखील घेत नाहीत. उलट नागरिकांना ओला कचरा सुका कचरा कागद वेगळे प्लास्टिक वेगळे असा दम भरण्यात येतो. कारवाई करू, फोटो काढू अशा अनेक धमक्या देण्यात येतात. मात्र स्वतःचे कर्तव्य बजावले जात नाही.

श्रीमंत बडे व्यापारी, मोठे हॉटेल व्यवसायिक, लॉजिंगवाले यांचा कचरा मात्र अगदी घरगड्यासारखा उचलला जातो. अगदी प्रामाणिकपणे त्यांना सहकार्य केले जाते. असा दुटप्पीपणा या मंडळी कडून करण्यात येत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार वाढतच चालला आहे. मागील दिवाळीच्या काळात व्यापाऱ्यांची व हॉटेल व्यवसायिकांची लूट करण्यात आली असल्याचा आरोप देखील झाला असून तशा तक्रारी नगरपरिषदेकडे करण्यात आल्या आहेत.

स्टेडियम पाठीमागून पोलीस स्टेशन कडे जाणारा सम्पूर्ण रस्ता हा आता डम्पिंग ग्राउंड झाला आहे की काय असा भास निर्माण होऊ लागला आहे. या संपूर्ण रस्त्यावर दगड विटा माती आणि तोडलेल्या फोडलेल्या बांधकामांचे रॅबिट आणून टाकण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. या रस्त्याकडे नगरपरिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने असे बेकायदेशीर उद्योग करणाऱ्यांचे फावले असल्याचे चित्र समोर आले आहे. हा परिसर प्रभाग क्रमांक 7 मध्ये असून येथील नगरसेवक फक्त मिरवण्यापुरतेच आहेत असा आरोप होत आहे. अजूनही काही दिवस याकडे दुर्लक्ष झाले तर हा रस्ता गायब होऊन त्या ठिकाणी तुम्हाला मातीचे कचऱ्याचे ढीग पडलेले दिसून येतील आणि ती जागा गिळंकृत झाल्याचे देखील समोर येईल. प्रशासनाला कधी जाग येईल असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!