उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आक्षेपार्ह पोस्ट…
संगमनेर शिवसेना (शिंदे) शहराध्यक्षाची तडकाफडकी हकालपट्टी
माणुसकीला काळीमा फासणारी प्रवृत्ती !
संगमनेर | प्रतिनिधी —
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, संगमनेरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) संगमनेर शहराध्यक्ष दिनेश भीमाशंकर फटांगरे यांनी सोशल मीडियावर अजित पवार यांच्या संदर्भात एक अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळल्यानंतर, पक्षाने त्यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी केली आहे. फटांगरे यांचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरलेली असताना, दिनेश फटांगरे यांनी फेसबुकवर एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. या पोस्टमुळे संगमनेरमधील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. समाज माध्यमातून याचे पडसाद उमटले. सातत्याने विरोधकांवर आक्षेपार्ह गरळ ओकणाऱ्या फटांगरे यांच्या बद्दल तीव्र संताप निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी शिवसेना पक्षाने ही कठोर कारवाई केली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फटांगरे यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. अशा दुखद प्रसंगी चुकीची पोस्ट करणे अत्यंत निंदनीय आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार दिनेश फटांगरे यांची संगमनेर शहर प्रमुख पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी प्रवृत्ती !
शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी माणुसकीला काळीमा फासणारे वक्तव्य केले आहे. दिनेश फटांगरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत गरळ ओकणारी प्रवृत्ती दाखवली आहे. फटांगरे हे आमदार अमोल खताळ यांचे “राईट हॅन्ड” म्हणून ओळखले जातात. अमोल खताळ यांची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट ते स्वतः आपल्या अकाउंट वरून शेअर करत असतात अशी विकृत प्रवृत्ती पक्षात ठेवू नये आमदार खताळ यांनी यावर गांभीर्यांने कारवाई करावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
मृत्यूनंतर वैरही संपतं असं म्हणतात, अशा आपल्या उदात्त संस्कृतीत दिनेश फटांगरे यांच्यासारख्या द्वेषपूर्ण प्रवृत्ती विष कालवण्याचे काम करतात. फटांगरे यांच्या या वक्तव्याचा नागरिकांमधून निषेध व्यक्त होत आहे.
