मनसेला महायुतीत घेण्याची गरज नाही — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंच्या महायुतीतील प्रवेशाबाबत भाष्य केलं आहे. मनसेला महायुतीमध्ये घेण्याची गरज नाही, असे रामदार आठवले म्हणाले. राज ठाकरेंची मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. राज ठाकरे यांनी दिल्लीत जात गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसेला किती जागा दिल्या जाणार यावरुन जोरदार चर्चा सुरु आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन जागांची मागणी केली असल्याचे म्हटले आहे. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पुण्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलले.

आठवले म्हणाले, मनसेला सोबत घ्यायची आवश्यकता नाही. मनसेमुळे मतांचा फरक पडणार नाही. त्यांना घ्यायचंच असेल तर वरचे नेते ठरवतील. आता आम्ही भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. आमच्या चिन्हावर दोन जागा लढवायच्या आहेत. महायुतीतील जागा वाटपात आरपीआयला दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी सातत्याने केली आहे.
शिवाय, शिर्डीच्या जागेवरुन स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लोकसभा लढवण्याची इच्छा रामदास आठवले यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

