जनावरे चारण्यासाठी हरिश्चंद्रगडाच्या गुहेत १५/१५ दिवस राहात होतो —
आमदार डॉ. किरण लहामटे
प्रतिनिधि —
जनावरे चारण्यासाठी मी ज्या ज्या वेळी हरिश्चंद्र गडावर जात असे त्या त्या वेळी मी पंधरा पंधरा दिवस तेथील गुहेत राहिलो आहे. गडावरील सरपंचाची गुहा (गडद) अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात याठिकाणी पाऊस उघडला की नाही हे सुद्धा समजत नाही कारण गोव्याच्या बाहेर जो ‘रिव्हर्स फॉल’ चालू असतो. त्यामुळे पाऊस बंद आहे की चालू हे समजण्यास मार्ग नसतो. असे सांगत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवल्या.
अकोले तालुक्याला अतिशय सुंदर निसर्ग संपदा लाभली आहे. पत्रकारांनी अकोले तालुक्यातील ही सुंदर निसर्गसंपदा जगासमोर आणावी असे आवाहन त्यांनी केले.
अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील गीते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आमदार लहामटे पुढे म्हणाले, की पत्रकारांनी त्यांचा अधिकार जनतेसाठी वापरला पाहिजे. मात्र पत्रकारिता ही आग भडकवणारी नसावी. द्वेष भावनेने केलेली पत्रकारिता एका दिशेला जाते. त्यातून समाजाचे हित साधले जात नाही. पत्रकारिता दोन्ही बाजूंचा विचार करणारी व समाजाला प्रोटेक्ट करणारी असावी.
फुले-आंबेडकर आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जनतेसाठी पत्रकारिता केली त्यांचा आदर्श जपला पाहिजे असे लहामटे म्हणाले.
पत्रकार संघाने यावर्षीचा अकोले गौरव पुरस्कार कोतुळ येथील डॉ. एस. के. सोमण यांना आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जादूच्या प्रयोगातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अंधश्रद्धे विषयी प्रबोधन करणारे व मॅजिक बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झालेले जादूगर पी. बी. हांडे, राज्य शासनाचा आदिवासी सेवक व दलित मित्र पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, अकोले तालुका वारकरी संप्रदायाचे अकोले तालुका अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ महाराज शेटे, नाशिक रोटरी कलब ऑफ नाशिक चा दर्पण पुरस्कार मिळाल्या बद्दल पत्रकार सुनील गीते याचा तसेच पिंगळा चित्रपटात प्रमुख भूमिकेतील रमेश खरबस यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, श्रीनिवास रेणुकादास यांनी मनोगत व्यक्त केले. संघाचे सेक्रेटरी प्रवीण धुमाळ व रमेश खरबस यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी पत्रकार गोकुळ कानकाटे, नंदकुमार मंडलिक, राजेंद्र जाधव, विलास तुपे, विनायक घाटकर, आबासाहेब मंडलिक, संजय उकिरडे हरिभाऊ आवारी, राजेंद्र उकिरडे, विनय समुद्र, अण्णासाहेब चौधरी, युवराज हंगेकर, राजेंद्र देशमुख, जयराम धादवड आदी उपस्थित होते.
