संगमनेरातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून कोट्यावधींचा निधी — महसूल मंत्री विखे पाटील
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते घुलेवाडी ते संगमनेर रस्त्याच्या चौपदरी कामाचे उद्घाटन
प्रतिनिधी —
संगमनेर येथील राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांसाठी केंद्र सरकारने २४ कोटी ५६ लाख व राज्य सरकारने ७ कोटी उपलब्ध करून दिले आहेत. राज्याच्या विकासासाठी केंद्राच्या निधीचे मोठे योगदान आहे. अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत च्या राष्ट्रीय महामार्ग क्र ६० घुलेवाडी ते संगमनेर रस्ता तसेच राज्यमार्ग क्र. ७१ अ राष्ट्रीय महामार्गाच्या ६० किलो मीटर पर्यंतच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याहस्ते आज संगमनेर येथे करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम तसेच राजेंद्र गोंदकर, रविंद्र अनासपुरे, नितीन दिनकर, सुनिल वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमुळे देश काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत प्रगतीच्या महामार्गावर आहे. देशात रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे. असे मत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जहागीरदार, ॲड. बापूसाहेब गुळवे, गोकुळ लांडगे, दीपक भगत, मेधा भगत, सिताराम मोहरीकर, डॉ. अरुण इथापे, अमोल खताळ, किशोर नावंदर आधी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

देशात गावा-गावांना जोडणारे पक्के रस्ते निर्माण झाले आहेत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान सडक योजनेमुळे देशात रस्त्यांचे पथदर्शी काम झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात देशाला नवीन २० योजना दिल्या आहेत. त्यामाध्यमातून देशात मुलभूत व पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे. २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी असणार आहे.
प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री

