गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह ४ आरोपी जेरबंद !

शस्त्रास्त्र तस्करीचे धागेदोरे आंतरराज्य टोळीशी…

५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  –

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोहीम उघडली आहे. श्रीरामपूर शहरातील वाकडी रोड परिसरात एलसीबीच्या पथकाने सापळा रचून १ गावठी कट्टा (पिस्तूल) आणि २ जिवंत काडतुसांसह ४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एर्टिगा कार, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव आणि त्यांच्या पथकातील अंमलदार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.

यादरम्यान, पोलिसांना खात्रीशीर गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वाकडी-श्रीरामपूर रोडने एका एर्टिगा गाडीतून चार इसम बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगून तो विक्री करण्याच्या उद्देशाने श्रीरामपूरच्या दिशेने येत आहेत. माहिती मिळताच पथकाने त्वरित हालचाली करत वाकडी रोडवरील यशवंत बाबा चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ दबा धरून सापळा लावला.

काही वेळातच संशयित एर्टिगा गाडी (क्रमांक: MH 48 AK 7763) श्रीरामपूरच्या दिशेने येताना दिसली. दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने गाडीचालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, पथकाने अत्यंत शिताफीने गाडीला वेढा घालून आतील चारही आरोपींना पकडले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

१) सागर दत्तु उपळकर (वय २८ वर्षे, चालक)

२) विशाल रामकिसन गुंजाळ (वय २६ वर्षे)

३) ऋतीक भगवान गुंजाळ (वय २५ वर्षे)

४) पवन गोरख उपळकर (वय २७ वर्षे)

(सर्व राहणार: रामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर)

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची आणि त्यांच्या वाहनाची कसून झडती घेतली असता, त्यांच्याकडून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला:

 ४०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र)

 ४,०००/- रुपये किमतीची ०२ जिवंत काडतुसे

 ५१,४००/- रुपये किमतीचे ३ मोबाईल आणि रोख रक्कम

 ५,००,०००/- रुपये किमतीची एर्टिगा चारचाकी गाडी. पकडण्यात आलेल्या आरोपींकडे जप्त केलेल्या शस्त्राबाबत सखोल चौकशी केली असता, त्यांनी हे अग्निशस्त्र मध्यप्रदेशातून खरेदी करून श्रीरामपूर परिसरात विक्री करण्यासाठी आणल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. यावरून या शस्त्रास्त्र तस्करीचे धागेदोरे आंतरराज्य टोळीशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रमीजराजा रफीक आत्तार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६७५/२०२६, आर्म ॲक्ट कलम ३, ७ आणि २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून, आरोपींनी यापूर्वी कोणाकोणाला शस्त्रे विकली आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

 सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि विकास जाधव, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, रमिजराजा आतार, भगवान थोरात आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!