अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते
अहिल्यानगर | प्रतिनिधी –
अमली पदार्थांचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृती व प्रभावी अंमलबजावणी यांवर विशेष भर देणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, औद्योगिक क्षेत्र तसेच समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत मादक पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी प्रभावी जनजागृती करून व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, तहसीलदार नागेश गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सहायक उपवनसंरक्षक अश्विनी दिघे, औषध निरीक्षक सो. बा. मुळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले की, अमली पदार्थांविरोधात समाजात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. शाळा व महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक यांच्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये मादक पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करावी. युवकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात यावी. संबंधित विभागांनी उद्योगांशी समन्वय साधून विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत. यामुळे व्यसनमुक्त व निरोगी कार्यसंस्कृती विकसित होण्यास मदत होईल. तसेच, जिल्ह्यातील बंद पडलेल्या रासायनिक कारखान्यांवर नियमित लक्ष ठेवून त्यांचा कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महसूल, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व संबंधित विभागांनी संयुक्तपणे अशा ठिकाणांची नियमित तपासणी करून संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

याशिवाय, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या काळात अमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीची शक्यता लक्षात घेऊन वन व कृषी विभागाने अधिक सतर्क राहावे. दुर्गम भाग, वनक्षेत्र तसेच संशयित ठिकाणांची नियमित पाहणी करावी. अमली पदार्थांची बेकायदेशीर लागवड आढळल्यास संबंधित पिके तात्काळ नष्ट करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देशही गिते यांनी यावेळी दिले.
