एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध झाला पाहिजे  –  डॉ.निलम गोऱ्हे

कोरोनाने पतीचा मृत्यू झालेल्या एकल महिलांशी साधला संवाद

महिलांच्या समस्या जाणून घेतल्या

प्रतिनिधी —

कोरोनाने पतीचा मृत्यू झालेल्या एकल महिलांचे पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना सन्मानाने जगता यावं. यासाठी रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे‌ गरजेचे आहे. असे मत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले.

संगमनेर येथील शासकीय वसतिगृहात कोरोनाने मृत्यू झालेल्या एकल महिलांशी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, कोरोना एकल समितीचे हेरंब कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे व तालुका संरक्षण अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या की, ज्यांचे पती शेतकरी होते. पण कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशा महिलांना कृषी विभागाने शेतीसाठी खते व बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत.

महिलांच्या नावावर मालमत्ता व शेती हस्तांतरित लवकरात लवकर उपलब्ध व्हावे. यासाठी महसूल प्रशासनाने अशा महिलांना न्यायिक सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. असे निर्देश ही श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

एकल महिलांनी फक्त उद्योगासाठी कर्ज मिळविणे या एकच उद्देश न ठेवता शिक्षणानुसार नोकरी प्राप्त करण्यावर भर द्यावा. जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक ‌विकास महामंडळ व किमान कौशल्य विभागाच्या योजनांच्या माध्यमातून या महिलांना लाभ देणे शक्य आहे‌. असेही गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले.

एकल महिलांपैकी काही महिलांना अद्याप ५० हजारांचा लाभ मिळालेला नाही, बालसंगोपन योजनेचा लाभ मिळाला‌‌ नाही, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला‌‌ नाही, वैयक्तीक कागदपत्रे काढतांना अनेक अडचणी येतात. यांसारख्या समस्या एकल महिलांनी यावेळी मांडल्या. त्यावर उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी उपस्थित अधिकारी यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला संगमनेर, अकोले, कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर या परिसरातील एकल महिला उपस्थित होत्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!